जांगडगुत्ता

 जांगडगुत्ता


सौ.हेमा पाटील.


 सकाळची आपली बायकांची कामाची गडबड असतेच.मग घरात दोन माणसे असोत किंवा सहा..आता नेहमीच येणारी प्रतिक्रिया असते की, तुम्ही काय दोन माणसे! दोन माणसांचे असे कितीसे काम असते? हा खरं तर संशोधनाचा विषय आहे, त्यामुळे यात खोलात न जाता आजच्या दिनविशेषाकडे वळते.


सकाळचे झाडलोट, आंघोळ, देवपूजा,चहा नाष्टा वैगेरे सगळे उरकल्यानंतर बाकी कामांची यादी डोक्यात ठेवून भाजीची पेंडी निवडायला बसले.तांदुळजाची भाजी होती.त्यात सुद्धा दोन प्रकार होते,देशी आणि सुधारित...आता यात काय सांगण्यासारखे एवढे विशेष असे तुम्ही म्हणाल,पण देशी भाजीत बी असते.ती भाजी झटकून आणि जास्त वेळा धुवून घ्यावी लागते.त्यामुळे साहजिकच दोन वेगवेगळ्या भांड्यात भाजी निवडावी लागत होती.देशी भाजी या कुंड्यात आणि सुधारित वाण चाळणीत अशी विभागणी सुरु होती.डोक्यात पुढच्या कामाचे नियोजन सुरू होते एवढ्यात हाक आली, " ऐ, काय करतेयस"?आता ही हाक कुणाची हे सुज्ञ वाचकांना सांगायची आवश्यकता आहे का? नाही.. 

अनुभवाने शहाणे झालेल्या मज पामराला माहीत होते की , आपण काय काम करतोय हे जाणून घेण्यापोटी किंवा आपल्या काळजीपोटी ही हाक नसून काहीतरी कामासाठी मारलेली ही अर्थपूर्ण हाक आहे! पण भाजी थोडी निवडायची राहिली होती, म्हणून जागा न सोडताच तेथूनच सांगितले," भाजी निवडतेय". अर्थातच असे उत्तर येईल अशी अपेक्षा नव्हतीच, त्याऐवजी अल्लाउद्दिनच्या चिरागातील राक्षसाप्रमाणे "क्या हुक्म है आंका"..असे विचारत मी समोर उभी राहीन अशी अपेक्षा होती. पण तसे न झाल्याने आता शब्दांच्या लाह्या तडतडा उडणार हे गृहीत धरले होते,तसेच झाले.जी बडबड सुरु झाली त्यातून मला एवढेच समजले की, "इन्व्हर्टरच्या बॅटरीत डिस्टील्ड वाॅटर ओतायचे आहे.तुला जमत नसले तर मी ओततो". इकडून मी परत आवाज दिला,"थोडीच भाजी निवडायची राहिली आहे,ती झाली की येते".दम धीर अजिबात नसतोच..आज आत्ता ताबडतोबच झाले पाहिजे..मला वाटते त्यामुळेच सुरेखा पुणेकरला ती लावणी सुचली असावी.. कारभारी दमानं..अर्थात त्याचा वेगळाच अर्थ सगळ्यांनी काढला..असो. तर मी तर हट्टाला पेटले होते,भाजी निवडून झाल्याशिवाय उठणार नाही.तुम्हीच सांगा बरं..तो सगळा भाजीचा पसारा तसाच टाकायचा आणि तिकडे जायचे.ते सगळे उरकायचे मग परत येऊन हातपाय धुवून मग राहिलेली भाजी निवडायची.त्याऐवजी हातातील काम पूर्ण करुन पाचेक मिनिटांनी गेले तर काय बिघडते? बरं ..काम पण काय एवढे अर्जंट नाही...पण

लाह्या जास्तच तडतडू लागल्या ते ऐकवेना.. त्यामुळे भाजी तशीच ठेवून उठले.डोक्यात खरं तर पुढच्या कामाचे नियोजन होते..पण ते बाजूला सारले व डिस्टिल्ड वाॅटर एवढेच डोक्यात ठेवले आणि आठवले.. अडगळीच्या खिडकीत मागची अर्धी बाटली शिल्लक आहे.डोक्यात तेवढेच होते त्यामुळे अडगळीच्या खिडकीतली बाटली उचलली व गेले.

"ही कुठली बाटली "असे यांनी विचारले तेव्हा मी सांगितले की,"मागची अर्धी शिल्लक होती ती आधी ओतते".

झाले.. बॅटरी ची दोन झाकणे उघडली होती,त्यात ती आधीची अर्धी बाटली न पहाताच ओतली.निम्मी ओतून झाल्यावर वेगळाच वास आला म्हणून थबकले हो...तर लगेच शेजारुन आवाज आला,"एवढ्याशाने काय काय होतेय..ओत सगळे ओत".


मग मी  बाटली नाकाशी नेली..मला वास यायच्या आधीच शेजारुन शब्द आले.."डिस्टील्ड म्हणजे अगदी शुद्ध पाणी असते ते..त्याला वास यायला ते काय अपेयपान आहे का"? पण मला वेगळाच वास आल्याने मी आता बाटलीवरील नाव वाचले...तर ते थिनर होते.मध्यंतरी  गेटला ऑईलपेंट देण्यासाठी आणले होते.नेहमीप्रमाणे काम झाल्यावर ते ही अडगळीच्या खिडकीत ठेवले गेले होते.आणि मी डिस्टील्ड वाॅटर म्हणून चक्क ती बाटली आणली होती..आणि थोडे बॅटरीत ओतलेही होते...आता तर हे समजल्यावर शब्दांच्या लाह्या डिस्को डान्स करणार हे माहीत होते,पण तरीही मी ती बाटली यांच्यासमोर धरली आणि सांगितले," हे थिनर आहे"...बस...पुढचा डिस्को डान्स तुम्ही कल्पनेने रंगवा.


मी तत्परतेने ती बॅटरी आडवी केली व ओतलेले थिनर बाहेर काढले.आता सुक्या सोबत थोडे ओले पण जळतेच ना..तसे आधीचे शिल्लक असलेले डिस्टिल्ड वाॅटर पण बाहेर पडले.थिनर ओतले होते फुलपात्र भर...पण तीन फुलपात्रेभर तरी बाहेर काढले..न जाणो बॅटरी बिघडली तर... म्हणून! लाह्यांमधून आवाज येतच होता, "बस कर बाहेर काढायचे..काही होणार नाही.आणि झाले तर बदलेन माझी मी नवीन बॅटरी...नाही तर इन्व्हर्टर बदलेन"..


बघा आता.. यासाठी शांत डोक्याने कामे करायची असतात.एका कामात दुसऱ्याचा जांगडगुत्ता झाला की असे काहीतरी तिसरेच होते. पण या आज आत्ता ताबडतोब वृत्तीला आजवर मला तरी उपाय सापडलेला नाही.तुमच्याकडे आहे का काही उपाय?

सौ.हेमा पाटील.

ता.क.- इन्व्हर्टर अगदी व्यवस्थितपणे सुरु आहे, त्यामुळे माझा जीव भांड्यात पडला आहे.इति हेमा उवाच..

दिनांक १५/४/२०२४

Comments

Popular posts from this blog

वर्षाव शुभेच्छांचा

समज

रिती ओंजळ