समज

 समज


©® सौ.हेमा पाटील.


"हॅलो, नमस्कार मॅडम.

मी सुधांशु , सुधांशु मोरे ".


"मी ओळखते का आपणांस? मला तर आठवत नाही".


"मी ओळखतो तुम्हांला मॅडम".


एव्हाना मॅडम वैतागल्या होत्या. त्यांनी विचारले, "कोण तुम्ही? कशासाठी फोन केला आहे"?


"मॅडम,मी तुमच्या लिखाणाचा फॅन आहे.मला तुमच्या कथा फार आवडतात".


"धन्यवाद. हे सांगण्यासाठी फोन केला होता का "? 


"नाही.म्हणजे हे पण सांगायचे होतेच! पण दुसरे बोलायचे होते ".


मॅडमना अंदाज आलाच होता म्हणून त्यांनी त्या वाचकाची बडबड थांबवण्यासाठी म्हंटले, " मी लिहायला बसले होते.तुमच्या फोन मुळे माझी लिंक तुटली".


पण तो मॅडमचा पंखा स्वतःच्याच विचारात गोल गोल फिरत होता त्यामुळे मॅडमची नाराजी त्याच्या लक्षातच आली नाही.


"माझा नंबर कुठून मिळाला"? 


"गेल्या वर्षी हितगुज दिवाळी अंकात आपली संस्कृती नावाची कथा प्रसिद्ध झाली होती बघा. त्या अंकात कथेच्या शेवटी छापला होता".


"अच्छा! ती कथा आवडली होती तर! पण  दिवाळी अंक प्रकाशित होऊन सहा महिने झाले आहेत.आत्ता का फोन केला आहे? तेव्हाच करणे संयुक्तिक होते ना"?


"त्या कथेविषयी नाही बोलायचे मला.. म्हणजे ती कथा छानच होती.आपल्या भारतीय संस्कृती विषयी तुम्ही सुंदर लिहिले होते.पण आत्ता परवा तुमची कथा वाचली.घटस्फोट! त्याविषयी बोलायचे होते".


"अच्छा! कशी वाटली कथा"?


"खूप वाईट वाटले.अगदी राहवले नाही म्हणून फोन केला".


"म्हणजे कथेत जिवंतपणा जाणवला तर"!


"अहो, इतका जिवंतपणा की एकेक प्रसंग वाचताना डोळ्यासमोर तुमचा चेहरा येत होता.कसे तुम्ही इतके सगळे सहन केले असेल असे वाटले.पण खरंच आहे , जेव्हा एखादा पुरुष आपल्या बायकोसोबत इतका वाईट वागतो तेव्हा तिने घटस्फोट घेऊन दूर होण्याचा निर्णय घेणेच योग्य"!


"धन्यवाद! माझी कथा इतकी समरस होऊन वाचणारा वाचक पाहून मला भरुन आले".


"मॅडम , अजिबात डोळ्यात पाणी आणायचे नाही.काहीही मदत लागली तर मला कळवा.मी तुमच्यासोबत आहे.तुम्ही एकट्या नाही आहात".


"हा काय वेडेपणा आहे"?


"रागावू नका हो.मनापासून सांगतोय.तुमची घटस्फोट ही कथा वाचल्यापासून तुम्ही किती दुःख सोसलेय हे समजून डोळ्याला डोळा लागला नाही.त्यामुळे तर तुमचे सांत्वन करण्यासाठी फोन केला".


"ओ मिस्टर, भानावर या.माझे व्यक्तीगत आयुष्य आणि माझी लेखनकला यांची सरमिसळ करु नका.घटस्फोट ही माझी काल्पनिक कथा आहे.लेखक जे काही लिहितो ते त्याच्या आयुष्यात  खरोखर घडत असते असे वाटते तुम्हाला? खरं तर  कलाकृतीत जिवंतपणा आणण्यासाठी लेखक कल्पनेत का होईना ते सगळे जगत असतो.तेव्हाच ती कथा उत्कृष्ट होते.एका दृष्टीने ती कथा हे लेखकाचे अपत्य असते.

लेखकांना  तुमच्यासारख्या वाचकांचा त्रास नवा नाही.अरे, लेखकांना प्रेमकथा लिहिण्यासाठी खरोखर प्रेमात पडावे लागत नाही.त्यांना कल्पनाशक्तीची ईश्वरी देणगी लाभलेली असते. समजले"?


"हो.चुकलेच माझे.पण तुमच्या लिखाणात इतका जिवंतपणा आहे की मला वाटले...असो.हा पंखा तुमच्या पुढील कथेची वाट पहातोय. तुम्हाला त्रास झाला यासाठी क्षमस्व ".


"माझ्या लेखनाचे फॅन आहात ना ! मग उद्या वाचा नवीन कथा..भूताची चाहूल! आता तेव्हा म्हणू नका मॅडम भूत कसे झालात म्हणून"! असे हसून म्हणत मॅडमनी फोन ठेवला.

©® सौ.हेमा पाटील.

Comments

Popular posts from this blog

वर्षाव शुभेच्छांचा

रिती ओंजळ