रिती ओंजळ
#रिती ओंजळ
©️ सौ.हेमा पाटील.
"जी में आता हैं तेरे दामन में सर छुपाके हम रोते रहे..रोते रहे
तेरे भी आखोंमे आसूंओंकी नमी तो नहीं....
तेरे बिना जिंदगी भी लेकीन जिंदगी तो नहीं...जिंदगी नहीं.. जिंदगी नहीं" |
लीना खूप अस्वस्थ होती.तिला आर्यनची खूप आठवण येत होती.आत्ता मोबाईल उचलावा आणि आर्यनला फोन करावा असे प्रकर्षाने वाटून तिने दोनदा मोबाईल उचलला पण होता आणि हताश होऊन परत टेबलवर ठेवला होता.आर्यन आपला फोन उचलेल की नाही याबाबत ती साशंक होती.आजवर आर्यनसोबत घालवलेले क्षण तिच्या मनात फेर धरत होते.एकामागून एक आठवणी पावसाच्या सरींसारख्या मनावर कोसळत होत्या.आणि त्यात न्हाऊन निघाल्यावर मन शांतवण्याऐवजी अधिकच अस्वस्थ झाले होते.आर्यनचा दुरावा साहवत नव्हता.आत्ता या क्षणी मर्यादेच्या सगळ्या बेड्या काढून फेकून द्याव्यात आणि अधिरपणे धावतच आर्यनकडे जावे व त्याच्या मिठीत शिरावे ही इच्छा प्रबळपणे मनात दाटून येत होती...आत्ता याक्षणी मला जगातील इतर कोणतेही सुख नको आहे..त्याच्या आश्वस्त बाहुपाशांचा विळखा हाच माझ्यासाठी याक्षणी माझी सर्वात महत्त्वाची गरज आहे.मला त्याच्याकडून काहीही मिळवायचे नाहीय अगर इतर कसलीही अपेक्षा नाहीय...पण तरीही त्याच्या बाहुपाशांची धरलेली अभिलाषा हीच त्याच्यामते मोठी मागणी आहे ...कारण तो मनाने तटस्थ आहे.आर्यनच्या मते," we are only friends. तू माझी फक्त चांगली आणि जवळची मैत्रीण आहेस.तुला प्रेयसीच्या रुपात मी कधीच पाहिले नाही.तशी भावना माझ्या मनात कधीच निर्माण झाली नाही".
हे ऐकल्यावर ती अगदी गोठल्यासारखी झाली होती. तिच्या मनातील भाव तिला साद घालत होते.पण तापत्या लाव्हारसासारखे आर्यनचे शब्द तिच्या कानावर पडत होते,पण ते हृदयावर वार करत होते.
आर्यन मात्र आपल्या मतावर ठाम होता.दोघांची मैत्री हा काॅलेजमधील चर्चेचा विषय झाला होता.सगळेजण दोघांकडे लव्हबर्डस् या नजरेतूनच पहात होते.सर्वांचा असा समज होणे साहजिकच होते,कारण काॅलेजच्या आवारात अगर बाहेरही दोघे सतत एकत्र दिसत.दोघांचे विचारही सारखेच असत.दोघांनाही एकमेकांच्या आवडीनिवडी अगदी तोंडपाठ होत्या.समाजात स्त्री पुरुष मैत्री कडे एकाच नात्याने पाहिले जाते.अर्थातच त्या दोघांनीही आजवर इतर कुणाच्या बोलण्याकडे कधीच लक्ष दिले नाही.त्यांची मैत्री फक्त काॅलेजमधील मर्यादित नव्हती. संध्याकाळी काॅलेजमधून घरी गेले तरीही रात्री झोपेपर्यंत त्या दोघांचे दोन तीनदा काॅल होतच असत.अगदी रात्री काय जेवलो हे ही ते एकमेकांना सांगत.यामुळेच लीनाचा असा समज झाला होता की,आपण दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलोय.तिच्या या विचाराला चाप बसला जेव्हा valentine day ला ती खूप उत्सुकतेने त्याच्याकडून गुलाबाचे फूल नक्की मिळेल म्हणून वाट पहात होती.पूर्ण दिवस वाट पहाण्यात गेला पण आर्यनने काही तिला गुलाबाचे फूल दिले नाही.तरीही तिच्या मनाला आशा वाटत होती की, संध्याकाळी छानसे ग्रिटींग कार्ड आणि गुलाब आर्यन नक्की देईल. वाट पाहून संध्याकाळी तिने स्वतः हून आर्यनला विचारले की,"माझे गुलाबाचे फूल कुठे आहे"?
यावर आर्यन म्हणाला,"कसले गुलाबाचे फूल"?
"अरे, असे काय करतोस? आज valentine day आहे ना! मी तुझी valentine आहे ना? मग मलाच फूल दिले नाहीस तू...मी केव्हापासून वाट पहातेय, की तू गुलाबाचे फूल घेऊन येशील..मग माझ्यासमोर गुडघ्यांवर बसशील,अन् मला म्हणशील..याचा स्वीकार कर प्रिये"...
"बरी आहेस ना तू? हे काय नवीनच खूळ डोक्यात घेतलेय? की काॅलेजच्या गॅदरिंग मध्ये भाग घेतला आहेस त्याचा हा एक पार्ट आहे का"?
"नाही रे..नाटक नाही हे..मी सिरीयसली विचारतेय तुला..सांग ना"!
"मला आधी हे सांग की कुणी सांगितले तुला की तू माझी valentine आहेस म्हणून"?
"कुणी सांगायला कशाला पाहिजे? कळते ते"...
"लीना..I am serious.असे काहीही नाही.आपल्यात फक्त मैत्री आहे.यापेक्षा अधिक काही नाही.माझ्याकडून भलतीच अपेक्षा ठेवू नकोस".
हे ऐकून लीनाच्या अंगावर जणू वीज पडल्यासारखी ती स्तब्ध झाली.आर्यन जे बोलायचे होते ते बोलून तिच्या मनःस्थितीचा विचार ही न करता तेथून चालता झाला.लीना हा धक्का सहन करत घरी कशी पोहोचली ते तिचे तिलाच कळले नाही.
खरंच काही घटना घडतात आणि आपण आपल्या सोयीनुसार त्याचा अर्थ लावत असतो.आर्यन तिची काळजी घ्यायचा.त्याला एखादी कविता आवडली तर तिला आवर्जून वाचून दाखवायचा.आपल्या भविष्यातील स्वप्नांबाबत तिच्याजवळ भरभरुन बोलायचा.तिच्या घरीही त्यांचे जाणेयेणे होते.रोजच्या सहवासामुळे एकमेकांच्या आवडीनिवडी एकमेकांना माहीत होणे अगदी साहजिकच होते. आणि यालाच ती वेडी प्रेम समजली होती.अर्थातच प्रेम तरी यापेक्षा वेगळे कुठे असते? माझ्या आयुष्यात तुझे स्थान अगदी महत्वाचे आहे,तुझ्यापाशी मनातील सगळे,अगदी सगळे.. म्हणजे सुखदुःखेच नाही तर अपमानास्पद अनुभव आणि मनाला सलणाऱ्या गोष्टी ही अगदी विश्वासाने सांगितल्या जातात ती विश्वासाची भावना म्हणजे प्रेम असे समीकरण तिने मांडले यात ती चुकीचा विचार करत होती असे आर्यनला वाटले तरी तिच्या जागेवर ती योग्यच होती.कारण मैत्री आणि प्रेम यात एक पुसट सीमारेषा असते.नकळतपणे आपण ती सीमारेषा ओलांडली आहे हे लक्षात येत नाही.आर्यनचे आपल्याला गृहीत धरणे हे लीनाच्या लेखी प्रेम होते आणि आर्यन मात्र तिला जवळची मैत्रीण समजत होता.पण आर्यनच्या लक्षात आले नव्हते की, आपल्याला लीनाची इतकी सवय झाली आहे की,ती संपर्क साधण्यासाठी एखादे दिवशी उपलब्ध नसेल तर आपण वेडेपिसे होऊन जातो.छोट्यातील छोटी गोष्ट असो की, आयुष्यातील एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असो,लीनाशी बोलल्याशिवाय तो निर्णय घेत नव्हता.
स्त्री आणि पुरुष यांच्या जडणघडणीत एक मूलभूत फरक आहे.शारीरिक आकर्षण म्हणजे प्रेम असे समीकरण जेव्हा मांडले जाते तेव्हा स्त्री त्यापासून कोसो दूर असते.तिच्या प्रेमाच्या कल्पना फार वेगळ्या असतात.आपल्या अस्तित्वाची जाणीव ठेवणारा, आपल्या हळव्या मनाचा विचार करणारा जोडीदार ती त्याच्यात शोधत असते. म्हणजे शारीरिक आकर्षण तिला नसते असे नाही, पण ती जोडीदारात मनाने गुंतते.तिच्या प्रत्येक विचारात तो असतोच.. किंबहुना त्याला वगळून ती काहीच करु शकत नाही.अगदी छोट्यातील छोटी गोष्ट असो की अतिशय महत्वाचा निर्णय...तिला आपलं माणूस प्रत्येक वेळी हवंच असतं.त्याच्या आवडीचा रंगच घ्या ना ! त्याला जो रंग आवडत नाही त्या रंगाचे कपडे वापरणे ती हळूहळू आपोआपच बंद करते.त्याची आवडनिवड, त्याचे आपल्या अवतीभवती असणे यातच तिचे सगळे सुख सामावलेले असते.स्वत:ला त्याच्याप्रती पूर्ण समर्पित करणे हेच तिच्यामते प्रेम असते.त्याला जे आवडते तेच खाण्याकडे तिचा कल असतो.हाॅटेलमध्ये गेल्यावर तर अशा प्रेमीजनांची मजाच येते.दोघेही जर एकमेकांच्या प्रेमात असतील तर दोघे आपल्या आवडीचा पदार्थ न मागवता आपल्या जोडीदाराच्या आवडीचा पदार्थ हमखास मागवतात. वेटर ही अनुभवाने दोन्ही पदार्थ आणून ठेवतो, पण ठेवताना ज्याने आॅर्डर केली आहे त्याच्या जोडीदारासमोर ती डिश ठेवतो.मग दोघेही एकमेकांकडे पाहून मनापासून हसतात.आपल्यासारख्या त्रयस्थ व्यक्तीला ही त्यांच्या नजरेची प्रेमाची भाषा समजते.परंतु यापलिकडेही स्त्री मनाने जेवढी गुंतते तेवढा पुरुष गुंतत नाही.ही त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे.काही अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील असे अपवाद असतात.असे मनाने स्त्री मध्ये गुंतणारे पुरुष ज्या स्त्रीच्या नशिबात येतात त्या स्त्रिया खूप भाग्यवान असतात.पण इथे आर्यनने तर तिला स्पष्टपणे नाकारले होते.
तिने आपली उदासीनता दूर सारुन मनाशी सारासार विचार केला आणि आर्यनने जे सांगितले ते समजून घेण्याचा प्रयत्न केला.तो आपल्याकडे मैत्रिणीच्या रुपात पहातो, त्यामुळे आपणही इथून पुढे त्याच नात्याने त्याच्याशी वागायचे.आपली प्रेमाची भावना आपल्या हृदयात कडीकुलूपात बंद करुन ठेवायची.आजनंतर कधीच त्याचा पुनरुच्चार करायचा नाही असे तिने ठरवले.आणि डोळ्यातील अश्रू पुसून तिने मोबाईल उचलला व आर्यनला फोन केला.आर्यनने फोन उचलला आणि तो म्हणाला,"कशी आहेस गं"...
हे वाक्य ऐकून तिचे डोळे पाण्याने डबडबले.तिने काहीच उत्तर दिले नाही.आर्यन पुढे म्हणाला, साॅरी लीना..मी फारच कठोरपणे बोललो ना तुला! तुझ्या मनाचा विचार केला नाही आणि तुला तिथेच सोडून मी निघून आलो हे चुकलेच माझे...एक माणूस म्हणून तू कसे वागावे हे मी नाही ठरवू शकत! तू माझ्याजवळ व्यक्त झालीस, पण मी गोंधळून गेलो कारण खरंच मी कधी तुझ्याकडे तशा नजरेने पाहिले नाही गं. तू अचानक असे काही विचारशील असे माझ्या मनी ध्यानी ही नसल्याने खरंच मला समजलेच नाही कसे वागावे हे..आणि आजवर एखाद्या मुलीने असे काही विचारण्याची माझ्या आयुष्यातील ही पहिलीच गोष्ट आहे.समजून घेशील ना मला"?
हे ऐकल्यावर लीनाच्या लक्षात त्याची अवस्था आली. शांतपणे ती म्हणाली,"अरे, मला जे वाटले ते मी बोलले.सोड ना आता ते...जेवलास का? काय होते आज जेवणात"?
तिची गाडी रोजच्यासारखी रुळावर आली हे पाहून त्याला बरे वाटले.तो धास्तावलाच होता, परंतु तिचा शांत स्वर ऐकून त्याचा जीव भांड्यात पडला."अगं जेवलोच नाही मी..मगाशी जे काही घडले त्यामुळे मी अस्वस्थच होतो".
"मग आता आधी जेवून घे पाहू.मग आपण गप्पा मारुया. चल बाय"...असे म्हणून तिने फोन कट केला.फोन कट करण्यासोबतच तिने आपल्या मनात फुललेल्या भावनेला कळीच्या रुपातच ठेवायचे आहे त्याला कधीच फुलून द्यायचे नाही हे स्वतः ला बजावले. आणि हे आर्यनला आपल्या वागण्याबोलण्यातून अजिबात जाणवता कामा नये. नजरेतून जाणवू नये यासाठी खूप काळजी घ्यावी लागेल कारण डोळे लगेच फितूर होतात. हे मुळीच सोपे नव्हते.कारण एकदा एखाद्या व्यक्तीवर जीव जडला की कितीही प्रयत्न केला तरीही स्त्री त्याला विसरु शकत नाही.अर्थात ते खरे प्रेम असेल तर..नाहीतर आर्थिक देवघेवीसाठी आणि शारीरिक आकर्षणापोटी जवळ येणारे फक्त गरज म्हणून जवळ आलेले जितक्या सहजतेने जवळ येतात तितक्याच सहजतेने दूरही होतात.प्रेम ही भावना या सगळ्यापासून अलिप्त आहे.आपल्या प्रियकरावर संपूर्ण समर्पित होऊन प्रेम करणे,साखरेसारखे त्याच्या अस्तित्वात विरघळून जाणे ही दैवी देणगी आहे.पण तितकेच अवघड आहे.खूपदा आयुष्य पणाला लागते...पण हे शिवधनुष्य तिला आता न डगमगता पेलायचे होते... कदाचित आयुष्यभर..इति हेमा उवाच
©️ सौ.हेमा पाटील.
९/५/२०२४
Comments
Post a Comment