परमानंद

 परमानंद 


©️सौ. हेमा पाटील.


  दिस पार ग्येला ह्ये बगून संज्यानं बिगी बिगी बैलाच्या फुढ्यात मक्यान इसकाटलं आन् तितनं त्यानं थेट गावाचा रस्ता नाटला...कारन त्याला हरिपाठ सुरु हुन्याआदी पोचायचं हुतं...हरिपाठाची वेळ झाली हुती.


  गावात दरसालासारखं यंदा बी ज्ञानेश्वरी पारायण बसलं हुतं. संज्या पारायणाला वाचायला बसायचा नाय, पन बालपनापास्नं मंदिरात हरिपाठाला जायाचा.त्यामुळं पारायणात टाळकरी म्हनून उभा रहायचा.रोज तिन्हीसांजंला प्रवचन असायचं,त्याला तो हजर असायचा,त्यामुळं तर लगबगीनं त्यानं गावाकडं धाव घ्येतली हुती.


  कासुर्डे गावात पंचेचाळीस वरसांपास्नं  दरसाली पारायण बसतं.ल्हान असल्यापास्नं संज्या बगत आलाय.हरिपाठात ताल धरतच त्यो ल्हानाचा मोटा झाला हुता. पारायण काळात  .संज्याला दिसभर शेतीची कामं उरकायची असतेती, पर सांजचीपारा हरिपाठ व किर्तन आजपतुर त्यानं कंदीच चुकवलं न्हाई.त्यामुळंच त्याची शेतातनं गावाकडं परतायची लगबग चालली हुती.


प्रवचन झालं, हरिपाठात तल्लीन होऊन एकसुरी पठण झालं..आता आज संतपंगत वरच्या आळीला हुती.टाळकरी सोबत्यांच्या संगं तो संत पंगतीला गेला.पारायण बसल्यापास्नं रोज गोड जेवान जिऊन कटाळा आला हुता.नाय म्हनायला आप्पांच्या संतपंगतीत घुटं भाकरी कुस्करुन मनापास्नं हानलं हुतं.आज आमरस पुरीचा बेत हुता. जेवून झाल्यावर तंबाकूवर बोटानं चुना मळत मळत संज्या मंदिराकडं आला.किर्तनात टाळकरी म्हनून उभं राह्यलं की तंबाकू खाता येत न्हाई.संज्यानं लै वेळा तंबाकू सोडायचा प्रयत्न केला हुता,पर रानातली कष्टाची कामं करताना तंबाकूची सय हुयाचीच..अन् कुनी बी पुडी अन् चुन्याची डबी फुडं करायचंच! त्यामुळं तंबाकू सुटनार न्हाई हे त्याला समजलं हुतं..पर हरिपाठाला जाताना,अन् टाळकरी म्हनून उभा ऱ्हाताना संजा तंबाखूला अजाबात हात लावायचा न्हाय.

   कालच्या अभंगाची बुवांनी केलेली फोड संज्याच्या मनात आजुन बी घोळत हुती.आजचा बुवा कुठल्या अभंगावर किर्तन सांगणार हाय याची उत्सुकता संज्याला लागली हुती.कालच्या बुवानं संत एकनाथ महाराजांच्या अभंगावर लै भारी किर्तन केलं हुतं.आजचा बुवा तर सोलापुरास्नं आलाय, अन् या बुवाचं किर्तन लै रंगतं हे त्यानं गेल्या पारायणात ऐकलं हुतं.

   किर्तनाला सुरवात झाली.टाळकरी उभं ऱ्हायलं तशी गावकरी फुडं हातरलेल्या ताडपतरी वरती यिऊन बसाय लागली. बायकास्नी समदं आवरुन यायचं म्हंजी येळच हुयाचा.काय काय बाया तर किर्तन सुरु झाल्याव खाली मान घालून पटदिशी जागा दिसंल तिथं यिऊन टेकत्यात..

बुवानं अभंग म्हनायला सुरवात केली आन् संज्या कान दिऊन ऐकाय लागला.


ओळखिला हरि धन्य तो संसारी | मोक्ष त्याचे घरीं सिद्धीसहित ||1||

सिद्धी लावी पिसें कोण तया पुसे |

नेले राजहंसें पाणी काय ||2||

काय तें करावे संदेही निर्गुण |

ज्ञानानें सगुण ओस केलें ||3||

केले कर्म झालें तेंचि भोगा आलें |

उपजले मेले ऐसे किती ||4||

ऐका जनार्दनीं नाही यातायाती | सुखाची विश्रांती हरिसंगें ||5||


किर्तनाला सुरवात झाली अन् संज्या बुवांच्या रसाळ ओघवत्या वाणीतून प्रकटणाऱ्या शब्दरसात न्हाऊन गेला.पुढे विवेचन करताना बुवांनी बोलण्याच्या ओघात, "माणसाला मरण जवळ आल्याचे समजते,पण आपण तिकडे लक्ष देत नाही असे सांगितले.उदाहरणादाखल त्यांनी सांगितले, आपले सहा महिने उरले असतील तेव्हा आपण पूर्व दिशेला तोंड करून उभे राहिलो तर आपली सावली दक्षिणेला पडते.सावली दक्षिणेला दिसली की समजून जावे आपले आयुष्य सहा महिने उरलेय..ते ऐकून संज्या जरा बावचळला.आसं कसं..हा विचार मनात घोळला आन् बुवांच्या फुडच्या चार वाक्यांकडं त्याचं दुर्लक्ष झालं.. विचार दूर सारुन संज्यानं परत बुवांच्या सांगन्याकडं लक्ष दिलं तवा बुवा सांगत हुतं, जेव्हा आपले नाक आपल्याला दिसायचे बंद होते तेव्हा आपल्या हातात फक्त एकच दिवस उरलेला असतो.मग त्या दिवसात काय करायचे ते करुन घ्यायचे... यासाठी नेहमीच मुखात अखंड नामस्मरण सुरू असले की या शेवटच्या क्षणाची काळजी वाटत नाही"...अशी अभंगाची उकल करायची चालली होती.


  संज्या टाळकरी हुता, हरिपाठ बी म्हनायचा,पर मरनाची भीती वाटत न्हाय येवडा फुडं गेला नव्हता.बुवाचं भाष्य ऐकून तो जरा गडबडला.आपलं मरान आपल्याला अगुदरच समाजतं हे ऐकून त्याला जरा आश्चर्यच वाटलं हुतं.त्यादिवशीचं किर्तन पार पडलं.आरती झाली,जागराला सुरवात झाली,आन् संज्या घरी झोपाय गेला.बुवानं सांगितलं हुतं त्येच डोसक्यात घोळत असताना झाॅप लागली.

सकाळ कोंबडं आवरलं तसा संज्या हातरुनावर उठून बसला.हात जोडून राम कृष्ण हरी म्हनत त्यानं डोळं उघडलं..अन् त्याच्या मनात ईचार आला आपलं नाक दिसतंय का..ते बगायचा तो प्रयत्न करत हुता पन त्याला नाकच दिसंना..त्येच्या पायाखालची जमीन सरकली.आयला..आपुन उद्याच्याला मरनार! परत मनात ईचार आला,आसं कुटं आसतं का! पर येवडा मोटा ज्ञानी बुवा..त्येनं ग्रंथातलं किती दाखलं दिलं हुतं राती..ते खोटं कसं असंल!

आपुन सुर्य उगवल्यावर आपली सावली कुटं पडती त्ये बगुया..असं मनाला समजावत त्यानं रानाचा रस्ता धरला.गुरांचं श्यान,वैरन पानी करस्तुवर सुर्य वर आला अन् याला ध्यान झालं..मग पूर्वेला त्वांड करुनशान तो हुभा राह्यला...पर त्याची सावली मागंच पडली.ती बगून त्याला बरं वाटलं,पर मनात ईचार आला, सा म्हैनं राह्यलं की सावली दक्षिनेला दिसती..नंतर परत पैल्यासारकीच दिसत आसनार...या दुविधेत तो सापडला.कामं उरकून तो घरला आला .बायकूनं पुढ्यात ठिवलेला च्या त्यानं कसातरी नरड्यातून खाली सारला आन् तो मंदिराकडं चालू पडला.गावातलं जुनं जाणतं काशिनाथ मास्तर त्याला दिसलं तसं त्याला हायसं वाटलं.तो मास्तरांस्नी म्हनला, "जरा ईचारायचं हुतं".मास्तर म्हनले," तुला परवानगी कधीपासून लागायला लागली? बोल की"!

"त्ये राती बुवांनी किर्तनात सांगितलं बगा..मरान जवळ आलं की काय काय हुतं ते खरंच आसतं का"?


"आता किर्तनकार बुवा ग्रंथातील दाखले देत खोटे बोलतील का? खरंच असते ते..पण आपल्या अंगी तेवढी समजून घेण्याची पात्रता असावी लागते. तुला काय खोटे वाटले"?असे मास्तरांनी विचारताच संज्या म्हनला," नाय नाय..खोटं नाय वाटलं, पर आपलं ईचारलं आसंच"! यवडंच बोलून तो तितनं बाजूला झाला,पर त्याच्या पोटात भीतीनं गोळा आला हुता. तो गपगुमान घरी गेला आन् भितीला टेकून बसला.रंगीनं धन्याला इचारलं, "का वं..आसं का बसलायसा! आज रानात जायाचं न्हाई का"?

यावर संज्या म्हनला,"ऐ बया! आजचा दिस तरी मला गपगुमान बसुदे की ! आजवर गाडा वढलाच की ! उगा माज्या मागं कार लावू नगंस.म्या आज कुटं बी जाणार न्हाय".


यावर धन्याकडं विचित्र नजरनं बघत कारभारीन कायतरी तोंडातल्या तोंडात पुटपुटत भायेर गेली अन् संज्यानं आपल्या पोरीला फोन केला."आजचा दिस घरला येशील का? तुला लै बघुसं वाटतंया"! पोरगी बापाचे असे आर्जवाचे शब्द ऐकून म्हणाली, का हो नाना? गेल्या आठवड्यात तर आले हुते की मी? सासू लगीच परत माह्यारला जाते म्हणलं तर धाडायची नाय.पन दोन दिसांत कायतरी जुगाड करुन मी भेटायला येते".


यावर संज्या म्हनाला," दोन दिसांनी यिऊन काय उपेग?आजच ये की".


"म्हंजी"? या लेकीच्या प्रश्नावर त्याच्याकडं उत्तर न्हवतं! लेकीची शेवटची भेट हुतीय का न्हाई या ईचारातच त्यानं भनीला फोन लावला."आक्के, काय करतीयास गं"?


"का रं संज्या? काय झालंया"? या आक्काच्या प्रश्नावर सोत्ताला सावरत, "कुटं काय"? आसं तो म्हनला पर आक्का म्हनली,"तुजं बारसं जेवलीया मी..तुज्या आवाजावरनं मला समाजतं..बोल काय झालंया"?


"अगं ,खरंच काय बी झाल्यालं नाय.गावात पारायण बसलंया, तर आज येतीस का ...रातचं किर्तन चांगलं आसतयां.आजचा एक दिस तरी ऐकचील.रोज मग कामाचा रगाडा हायेच मागं"!


"अजून चार दिस आसंल ना! मग समाप्तीला येते की! आज भांगलायला बायका हैती.रानात त्यांच्या मागं जाया लागंल मला".

सासुरवाशीन असलेल्या भनीला आपुन मनात यील तवा बोलवू शकत न्हाई हे सत्य पचवत त्यानं फोन ठेवला.


बायकू त्याच्याकडं बघत आतभायेर करत तिची कामं उरकत हुती.आज धन्याला काय झालंया याचं कोडं तिला उलगडत नव्हतं..ती राती किर्तन ऐकाय आली हुती, पर तिनं तो किर्तनात बुवानं दिलेला दाखला अजमावून बघन्याचा प्रयत्न केला नव्हता. बुवाचं चार चांगलं सबुद कानाव पडत्यात म्हनून किर्तनाला जायाचं यवडंच!


यवड्यात दारात मोटारसायकलचा आवाज आला. लेक अन् जावाई गाडीवरनं खाली उतारलं.लेकीला बगून संज्याला बरं वाटलं. आईला वाटलं, काय काम आसंल म्हनून आलं असतील. तिनं जावायाला पाण्याचा तांब्या भरुन दिला. च्या ठिवला अन् लागल्या वढीनं बोटवं शिजवायला पाण्याचं आदान चुलीवर ठेवलं. त्यात तेलाची धार धरली. उकाळत्या पान्यात बोटवं वैरलं अन् चांगलं वाफाललं की समद्यांस्नी ताटल्यांमदी दिलं..वर घरच्या तुपाची धार धरली आन् वरनं दुध घालून गुळाची वाटी संगं दिली.चार कुरडया तळल्या हुत्या त्या बी दिल्या.लेकीनं बापाला इचारलं,"नाना, का येवडं अर्जंट बोलवलसा"? ते ऐकून बायकूनं टककन संज्याकडं बगीतलं.

  ‌रंगीची नजर चुकवत संज्या म्हनला,"कुटं काय..बघू वाटलं तुला"... पोरगी बापाच्या तोंडाकडं टकामका बगू लागली.जावाई उटून भायेर गेला तशी रंगी म्हनली," आज तुज्या बापाचं चित थाऱ्यावं न्हाई. सकाळी उटल्यापास्नं बगतीया, आता तूच ईचार बया..मी चालले रानात".

"मामी, आमी आलुया अन् तुम्ही कुटं रानात जाताया..बसा की घटकाभर..सांजच्यापारी आमी परतनार हाय".जावायाचं बोलणं ऐकून मामी म्हनली,"आवं,पारायन बसलंया ना, त्यामुळं वशाट काय बनवता येणार न्हाय.शेतातनं गुरास्नी वैरनपाणी दाखवून येते आन् मंग जेवान बनिवते..पर आज शिरखंड चपातीच असंल बरं का"!

"जेवनापाशी काय हाय मामी..बनवा काय बी ! मी जरा त्या पलिकडच्या लव्हाराकडनं येतो.खुरपी लावायला दिली हुती.झालेती का बगून येतो" असे म्हणत जावायाने काढता पाय घेतला.रंगीने रानात जाताना लेकीला चपातीचं पीठ भिजवाय सांगितलं.गॅसवर कुकरला डाळ भात लावून लेक बापापाशी यिऊन बसली.तिच्याकडं डोळं भरुन पहात बापानं इचारलं,"संगे, सासरी खुशीत हायेस ना? नवरा जपतो ना तुला"?

"व्हय नाना, आता बघा की तुमीच..मला नानांस्नी बघू वाटतंया म्हनलं तर लगीच घेऊन आलेती.सासूची जरा पीरपीर असतीया,पर मी मनाला लावून घेत न्हाई.सोत्ताचा आयुषभर टक्कंटोणपं खाऊन हुभा केलेला सौंसार दुसऱ्याकडं सोपवताना तिचा जीव जळणारच की..ल्हानाचं मोठं केलेलं प्वार आता आपला पदुर सोडून बायकूचा पदुर धरतुया हे बगताना कुटल्याबी आईला वाईट वाटणारच की"!

लेकीचे हे समजुतीचे बोल ऐकून आपली कालपरवापर्यंत अंगाखांद्यावर खेळलेली पोरगी लै मोठी झाली, समोरच्या मानसाच्या मनातलं जानायला शिकली हे पाहून तो सुखावला.आपल्या माघारी आपली लेक सोत्ताचा संसार सुखानं करंल आशी त्याची खात्री पटली.तिच्या डोक्यावरनं हात फिरवत तो म्हनाला,"अशीच शान्यासारकी वागत जा.मानसं जोडून ठीव.कुनाला कदीच टाकून बोलू नगंस.सासरची नाती जप".

नानांना आज काय झालंय हे लेकीला कळंना.पर बापाच्या नजरंतनं जी माया वाहात हुती ती पाहून तिचा जीव गलबलला व तिचेही डोळे भरुन आले.तेवड्यात जावाई परत आला अन् पाठोपाठ रंगी पर रानाकडनं आली...

शिरखंड चपाती,भजीचं जेवान झालं अन् लेक जावाई परत निघालं.लेकीकडं डोळं भरून बघत संज्या जावायाला म्हनला, "माझ्या लेकीला जपा.माज्या काळजाचा तुकडा हाय". जावाई बायकूकडं बगाय लागला, हीनं बापापाशी आपली काय कागाळी केलीया का म्हनून..हे संज्याच्या धेनात आलं..तो म्हनला, "तिनं काय बी सांगितलं न्हाय,उलट तुमचं कौतिकच करती न्हेमी ! पर बापाचं काळीज हाय म्हनून बोललो". यावर जावाई बोलला,"तिची काय बी काळजी करु नका मामा".

लेक जावायाच्या गाडीचा आवाज दूर गेल्यावर ऐकू येईनासा होईस्तवर संज्या तिकडंच बघत हुता..मंग त्याला गुरांची, शेताची आठवन झाली तसा तो पायतान अडकवून खांद्यावर टाॅवेल टाकून भायेरच्या भायेरनंच शेताकडं निघाला.अजून आपुन जित्तं हाय.पर उद्यापत्तुर काय सांगू शकत न्हाय अशा विचारातच तो रानात पोचला.हैबतीच्या फुड्यात हिरवंगार घासगवात पसरून तो त्याच्या अंगावरुन मायेनं हात फिरवत उभा राह्यला.आपली सवय असलेला हैबती आपुन उद्याचाला नसलो तर कुणाला जवळ यिऊ द्यायचा न्हाई या काळजीनं त्याचा जीव हलला." आसा हट्टीपणा करु नगंस.मी नसलो तरी बी कुनी पानी पाजंल त्येच्यावर शिंग उगारु नगंस..यवडं ऐक माजं" धन्याचं बोलणं समजल्यासारकं हैबतीनं डोस्कं हलवलं तसं संज्याला बरं वाटलं.शेतावरनं  नजर फिरवत त्यानं शेतातली माती आपल्या कपाळावर लावली. काळ्या आईला डोस्कं खाली टेकवून नमस्कार केला. "आजवर तुज्या जीवावर घराचा गाडा वढला.पोरीचं लगीन केलं.पोराला शिकवून शेरात पाटीवलं..आता माझं काय खरं नाय. घरावर तुजी किरपा अशीच ऱ्हाऊदे".

असे म्हणत तो शांतपणे हरिपाठासाठी मंदिराकडे निघाला.


रोजच्यासारखा हरिपाठ झाला, आरती बी झाली.आज संतपंगत विठ्ठलमामांच्यात हुती म्हनून तो तिकडं गेला अन् तिकडनं थेट मंदिरापाशीच आला.आता किर्तन सुरू हुयाला थोडा येळ हुता.तो मंदिरात विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीसमूर बसला.एकटक मूर्तीकडे बघत असताना त्याचं ध्यान लागलं.जेवान होईल तसं लोकं मंदिराकडं यायला लागली तशी कुनीतरी संज्याला हाळी मारली.संज्या समाधी अवस्थेमदी पोचला हुता, त्यामुळे त्याच्यापतुर हाक पोचली नाय, म्हनून महादूनं त्येला गदागदा हलिवलं,"काय लेका! किर्तन हुभं ऱ्हायची येळ जाली की..आज काय टाळ घेनार न्हाईस का"? हे ऐकून त्यो ताडदिशी उटला व 'आजचा दिस तर आपल्या हातात हाय,उद्या असू नसू देवाला ठावं.. आजचं किर्तन तर ध्यान दिऊन आयकू' असा विचार करत गळ्यात टाळ अडकवून तो किर्तनासाठी हुभा ऱाह्यला.


      टाळकरी किर्तनात रंगून गेल्यावर अभंगावर टाळ वाजवत भक्तीच्या एका परमोच्च बिंदूवर पोचल्यावर टाळकऱ्यांनी उडी मारली.ही उडी मारताना संज्याला कळलं, फकस्त हाच आनंद आपुन आपल्यासंगं घेऊन जानार हाय..बाकी समदं इथंच सोडून जायाचं असतं... सोत्ताला इसरुन भक्तीमंदी डुबकी मारत मिळनारा आनंद हेच सत्य! बाकी सगळं मायाजाळ!


किर्तनात बुवा तालासुरात म्हणत हुता,

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी

तेणें मुक्ती चारी साधियेल्या ||

 हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ||

आणि नाक न दिसल्यानं दिवसभर मनावर मरणाचे आलेले दडपण झुगारून देऊन संज्या तल्लीन होऊन टाळकऱ्यांसह किर्तनात मनापासून रंगून गेला होता.इति हेमा उवाच...

©️सौ. हेमा पाटील.

दिनांक २८/५/२०२४

Comments

  1. खूप छान.. संज्याचा भोळेपणा आणि त्यातून निर्माण झालेले प्रसंग...ग्रामीण बोली उत्तम..खूप दिवसातून अशी वेगळी कथा वाचायला मिळाली..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वर्षाव शुभेच्छांचा

समज

रिती ओंजळ