कोपराची कळ
कोपराची कळ
©️सौ. हेमा पाटील.
"अहो..हे काय? रवा आणलाच नाहीत तुम्ही! कसे तुमचे काम असते..एवढे निक्षून सांगितले होते तरीही विसरलात"!
"अगं नीट बघ.रवा आणलाय मी"!
"कुठे? तो आणलाय तो जाड रवा आणलाय..तो उपम्यासाठी आणायला सांगितलाच होता, पण आदिला शिरा आवडतो म्हणून आवर्जून बारीक चमेली रवा आणायला सांगितला होता, तरीही विसरुन आलात".
"रवाच आहे ना..याचा बनव शिरा".
"त्याला प्रसादाचा शिरा असतो तसा दूध,केळ घालून बनवलेला शिरा आवडतो.विसरलात"?
"हो गं..वय झाले हेच खरे! विसरलो खरं.. संध्याकाळी फिरायला जाईन तेव्हा आणतो.बाकी सामान बघ एकदा काही राहिले नाही ना"...
माधुरी ताई आणि विठ्ठल रावांची गेले चार दिवस लगबग सुरू होती.दुधावरची साय सुट्टीला येणार होती.सुनबाई व मुलाने दरवर्षी प्रमाणे यंदाही में महिन्यात एका आठवड्याची सुट्टी घेतली होती व चार दिवसांत ते सगळेजण गावी येणार होते.माधुरीताईंना दरवर्षी प्रमाणेच काय करु अन् काय नको असे झाले होते.कालच त्यांनी घरघ़ंटीवर तांदूळ दळून घेतले होते. आदिला घावन व दूध फार आवडते म्हणून... थालीपीठासाठी भाजलेली धान्ये थंड होण्याची त्या वाट पहात होत्या.उत्ताप्पा व इडल्या करण्यासाठी त्यांनी उडिद डाळ आणून ठेवली होती.घरचे साजुक तूप होतेच ! ही सगळी जनता डेरेदाखल होण्यापूर्वी त्यांनी बेसनाचे लाडू बनवले होते.त्यांच्या अंगात संचारलेला उत्साह पाहून विठ्ठल राव मनाशी विचार करत होते, ही तीच माधुरी आहे का,कधीतरी एखादे दिवशी संध्याकाळी जरा चमचमीत काहीतरी कर असे सांगितले तर हसून टाळणारी...पण त्यांच्यात संचारलेल्या उत्साहाला गालबोट लागू नये म्हणून विठ्ठल राव शांतपणे त्यांची लगबग पहात होते.
माधुरीताई विचारात गढून गेल्या होत्या.आपण सुनबाई असतानाचे दिवस त्यांना आठवले.माहेरी गेल्यावर "कसे आहे गं तुझे सासर"? या आईच्या प्रश्नावर "हाताच्या कोपराच्या कळेसारखे"...असे उत्तर त्यांनी दिले होते. ते ऐकून आईच्या डोळ्यात पाणी उभे राहिले होते.कारण हाताच्या कोपरावर जर मार लागला तर जी जीवघेणी कळ येते त्याची तुलना कशाचीच करु शकत नाही.
लेकीच्या तोंडावरुन मायेने हात फिरवत आई म्हणाली होती,"अगं, बाईचा जन्मच असा असतो.आज माझ्याजवळ बोललीस,पण इतर कुणाकडे याचा कधीच उच्चार करु नकोस.लेकीचे नांदणे सुरळीतपणे मार्गी लागणे ही आईने केलेल्या संस्कारांची पोचपावती असते". हे ऐकून माधुरी ताईंनी परत कधीच ब्र शब्द काढला नाही.पण आपल्या बाबतीत जे घडले ते आपल्या सुनेच्या बाबतीत आपण करायचे नाही हा निश्चय त्यांनी मुलगा जन्माला यायच्या आधीच केला होता व तो कसोशीने पाळला होता.
बघता बघता चार दिवस कामाच्या धांदलीत व येणारांच्या आठवणीत कसे संपले हे माधुरी ताईंना समजले ही नाही. आणि अगदी आतुरतेने वाट पहात असलेला तो दिवस उजाडला. गाडीतून उतरताच माधुरीताईंकडे झेप घेत "आज्जी"...असे म्हणत गळ्याभोवती नाजूक करकमलांची मिठी घालणाऱ्या आदिच्या कोमल स्पर्शाने त्या मोहरुन गेल्या.मग सुरु झाला आज्जी आणि नातवाचा सुरेल अन् प्रेमळ संवाद...घावन बनवून ते नारळाच्या दुधासोबत देताना आज्जीला खूप आनंद झाला होता, परन्तु त्यापेक्षा जास्त समाधान आदिला ते खाताना पाहून झाला. आज्जी नातवाच्यात चाललेला हा सुखसंवाद विठ्ठलराव दुरुनच पाहून सुखावत होते.
मग पुढचे चार दिवस सगळे पथ्यपाणी धाब्यावर बसवून माधुरी ताईंनी सकाळ दुपार संध्याकाळ एकसे एक सुग्रास पदार्थ बनवून सर्वांना खायला घातले.सुनबाई पण कायमच्या कामाच्या धबडग्यातून बाहेर पडून जरा विसावली होती. कार्पोरेट क्षेत्रातील नोकऱ्या म्हणजे माणूस किती पिळले जाते हे माधुरी ताईंनी आदि लहान असताना त्याला सांभाळण्यासाठी वर्षभर गेल्या होत्या तेव्हा पाहिले होते. त्यामुळे सुनबाईला या आठ दिवसांत किचनमध्ये येण्याची बंदी माधुरी ताईंनी मागेच घातली होती.कायमच घड्याळाच्या काट्यावर धावत असल्याने या आठ दिवसांत आपण जगतोय, श्वास घेतोय याची जाणीव करुन घेताना मुलगा व सुनबाई जरा सैलावतात व मनावरील,शरीरावरील सगळा ताण सोडून ताजेतवाने होतात हे माधुरी ताईंनी अनुभवले होते. आदिला तर आज्जीशी काय काय साठलेले बोलायचे असते...ते ऐकून घेण्यासाठी माधुरीताईही खूप आतुर असतात.
एकत्र कुटुंब म्हणजे याहून वेगळे काय असते?कायमच एकत्र राहणे शक्य नसले तरी एकमेकांची मने एकत्र बांधून ठेवण्यात माधुरी ताई कमालीच्या यशस्वी झाल्या होत्या.नाहीतर म्हणायला एकत्र कुटुंब असते,पण कुटुंबात मात्र विसंवाद आढळतो.पण इथे मात्र तसे नव्हते. या आठ दिवसांत त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडतो, पण आपल्या मुलांसाठीच करायचेय असे म्हणत त्या दररोज मुलगा, सुनबाई व नातू यांच्या आवडीचे पदार्थ बनवून खायला घालतात.नातवाला दररोज गोष्टींचा रतीब घालतात.आपण मुलांसाठी एवढेच करु शकतो हे माधुरी ताईंनी जाणले होते.
आईंची या आठ दिवसांत प्रेमाने चाललेली लगबग पाहून त्यांचे आपल्या प्रती असलेले अव्यक्त प्रेम,माया सुनबाई ही जाणून घेते. या आठ दिवसांत दोघींमधील नात्याचे रेशीम बंध अधिकाधिक दृढ होत जातात.दूर राहूनही मनात आपुलकी जपत ती ही सासूमधील आईला बरोबर जाणते व दरवर्षी या आठ दिवसांची असोशीने वाट पहाते.नाही म्हणायला अधूनमधून माधुरी ताई व विठ्ठल राव मुलाकडे जात असतात.पण तेव्हा सुनबाई तिच्या दैनंदिन ऑफीसच्या धावपळीत त्यांच्याकडे फारसे लक्ष देऊ शकत नाही.त्यांच्यासाठी वेळ काढू शकत नाही.पण याची उणीव ती सुट्टीच्या दिवशी शनिवारी रविवारी भरुन काढतेच. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असलेले जिव्हाळ्याचे संस्कार पाहून विठ्ठल राव अगदी आनंदित होतात.एकत्र राहून सासूने आपण सासू असण्याची कायम जाणीवपूर्वक जाणीव करून देणे व सुनेने सून म्हणून जगण्याची लक्ष्मणरेषा आखून घेणे या रुढीला माधुरी ताईंनी छेद दिला होता व त्यामुळेच मने जुळली होती व कुटुंब दूर राहून ही अभंग राहिले होते..इति हेमा उवाच.. दिनांक ११/ ५ /२०२४
©️सौ. हेमा पाटील.
Comments
Post a Comment