डोह

 



डोह




©️सौ. हेमा पाटील.




    मे महिन्याची सुट्टी लागली आणि मनोजला गावी जाण्याचे वेध लागले.यंदा काॅलेजचे लास्ट ईयर असल्याने ही शेवटची सुट्टी गावी मनमुरादपणे उपभोगायची असे ठरवून त्याचे कालपासूनच पॅकींग सुरु होते. 


कॅम्पस इंटरव्ह्यू मध्येच उत्तम कंपनीत चांगल्या पॅकेज वर सिलेक्शन झाल्याने तो एकदम रिलॅक्स होता. रिझल्ट लागला की कंपनीकडून जाॅईनिंगचे लेटर येणार होते. तोपर्यंत सुट्टीच सुट्टी... 


   सकाळच्या बसने तो निघाला पण..! कधी एकदा गावाला जातोय अन मस्तपैकी शिवारात हुंदडतोय असे त्याला झाले होते. 


  घरी आला तर अण्णा आजोबा सोप्यातच झोपाळ्यावर बसून शेंगा व चुलीतल्या आरावर भाजलेल्या भातवड्या खात बसले होते. त्याला पाहून त्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहराभर पसरला. त्याकडे प्रेमाने पहात फ्रेश व्हायला तो आत गेला. हातपाय धुवून बाहेर आला व सर्वांच्या पाया पडला. तोपर्यंत तो आल्याची बातमी वाड्यात पसरली होतीच, व घरी असलेले सगळेजण सोप्यात जमा झालेच होते. मग काय विचारता.. आजोबांसोबत भातवड्या शेंगा खात खात सर्वांशी गप्पा सुरु झाल्या. तोपर्यंत काकीने चहा करुन आणला. चहा घेऊन बाहेर पडला तो मित्रांच्या गराड्यात इतका रुळला की, संदेश जेवायला बोलवायला आला तेव्हा घराकडे पावले वळली ते पण उद्या सकाळी डोहावर पोहायला जायचे हे ठरवूनच! 




    घरी काका, आज्जी रानातून आले होते. मग सर्वांची अंगतप़ंगत बसली. जेवणे उरकल्यावर बाहेर गप्पांचा फड जमला.तिथेच वाकळा अंथरुन त्यावर आडवे पडून बच्चेकंपनी गप्पा ऐकत ऐकत झोपी गेली. त्यांच्याजवळच मनोजही कलंडला व लगेचच झोपेच्या स्वाधीन झाला.            


सकाळी चिमण्यांचा चिवचिवाट व कोकिळेच्या कुहू s कुहू s च्या मंजूळ आवाजाने त्याला जाग आली.तो खूप सुखावला व अंथरुणावर  ऐकत पडून राहिला. पण दुसर्याच क्षणी त्याला आठवले, आपल्याला जायचेय पोहायला. मग तो उठलाच. बाकीचे सगळे आवरुन तो सवंगड्यांची वाट पहात बसला. मन्याs  अशी हाक येताच टाॅवेलची गुंडाळी घेऊन तयारच असलेला मन्या बाहेर पडला. मुंबईत असे मुक्त जीवन उपभोगता येत नाही. त्यामुळे गावी आला की मनोज आनंदाचा मिळालेला ठेवा तनमनात भरुन पूर्ण रिचार्ज होऊनच मुंबईला परतायचा. 




     आज डोहाकडे जाताना वाटेत कुणाच्या शेतात काय केलेय, काय बदल झालेत हे निरखत त्यावर चर्चा करत ते डोहावर पोहोचले. ही त्याची खूप आवडती जागा होती. 


डोहाकडे पहाताच त्याचा उरलासुरला संयम संपला व धावत जाऊन त्याने डोहात उडी घेतली. त्याबरोबर पाणी उंच उडाले. डोहातील पाणीही आपल्याला कवेत घेण्यासाठी आतुर झाले आहे असे त्याला वाटले. तो अगदी गुंगून गेला. सोबती काय बोलतायत याकडेही त्याचे फारसे लक्ष नव्हते. मग सुरु झाला रोजचाच दिनक्रम.. सकाळी डोहावर यायचे, मग घरी जाऊन न्याहरी करायची. काकासोबत शेतावर जायचे. दुपारी जेवण करुन तिथेच झाडाखाली कल़ंडायचे, मग गुरांना वैरण-पाणी करुन संध्याकाळी घरी यायचे. संध्याकाळी सोबत्यांसोबत गप्पा गोष्टी करुन आल्यावर जेवायचे अन आडवे झाले की क्षणभरात झोपेच्या स्वाधीन व्हायचे. 




     असाच एक दिवस उजाडला. रविवार होता. आदल्या रात्री आजोबांनी सांगितले होते, उद्या सगळ्यांनी लौकर उठून आंघोळी उरका व नैवेद्याला दहीभात तयार ठेवा. उद्या आपण भैरोबाला जाणार आहे. ते ऐकून तो हिरमुसला. म्हणजे उद्या डोहावर जाता येणार नाही... 




  ठरल्याप्रमाणे सगळे लौकर आवरुन तयार झाले. भैरोबाला जाताना वाटेत करवंदाच्या जाळ्या़तील करवंदे खात खात  गमतीजमती करत सगळे चालले होते. समोरच तात्याच्या आंब्याखाली संदेशला दोन पाड सापडले. त्यातला एक मनोजला देऊन दुसरा दातांनी कुरतडायला संदेशने सुरवात केली. मनोजनेही आंबटगोड चवीचा पाड  खायला सुरुवात केली. भैरोबाला दर्शन घेऊन राखणीचा कौल घेऊन माघारी फिरेपर्यंत दहा वाजले होते.मग काकीने बनवलेल्या घुट्यात भाकरी कुस्करुन खात असताना त्याच्या अवीट चवीचे त्याला खूप अप्रुप वाटले. नेहमीप्रमाणेच घुट्याबरोबर अंमळ चार घास जादाच खाऊन तो उठला. अशी घुट्याची चव मुंबईत का लागत नाही हा विचारही नेहमीप्रमाणेच याही वेळी त्याच्या मनात आला. मग माडीवर जाऊन त्याने ताणून दिली ते साडेचार वाजताच उठला. काकी हाक मारत होती, एवढा चहा रानात नेऊन दे म्हणून... 


       तो उठला, तोंडावर पाणी मारले व गळ्यात टाॅवेलची गुंडाळी करुन टाकली आणि  हातात किटली घेऊन रानाची वाट चालू लागला. काकाकडे किटली दिली अन काय त्याच्या मनात आले, तो काकाला म्हणाला.. मी जातो. काकाला विशेष वाटले, पण तो काहीच बोलला नाही. चार दिवस पोरगं येतंय तर करुदे मनासारखं.. असे म्हणून तो ठीक आहे म्हणाला. 


    मनोज तिथून निघाला तो थेट डोहाचा रस्ता त्याने पकडला. आज सकाळी डुंबणे चुकल्याने त्याला कसेतरीच झाले होते. डोह नजरेच्या टप्प्यात येताच त्याने धावायलाच सुरवात केली. समोरुन येणारा बजाप्पा त्याला म्हणाला ही, आरं पोरा का धावतुयास.. पण त्याला काहीच उत्तर न देता तो धावतच होता. कडेला टाॅवेलची गुंडाळी फेकून अ़ंगावरचे कपडे कसेबसे काढून त्याने स्वतः ला डोहाच्या स्वाधीन केले. 




  काका तिन्हीसांज झाली की घरी आला. सगळेजण आपापल्या कामात मग्न होते. काकाला वाटले मन्या गेलाय सव़ंगड्यांकडे.. जेवणाची वेळ झाली अन काकीने संदेशला मन्याला जेवायला बोलावून आणायला सांगितले. संदेश गेला पण मन्या कुठेच नव्हता.सकाळपासून मन्या आमच्याकडे फिरकलाच नाही असेच सगळ्यांनी सांगितले. 


संदेश घरी आला व दादा कुठेच नाही हे त्याने आईला सांगितले. वर माडीवर जाऊन बघ असे आईने सांगितले म्हणून संदेश वर पण पाहून आला.ताटे वाढून तयार होती, असेल इथेच कुठेतरी..बघून येतो असे म्हणून काका हाका मारत बाहेर पडला. पण मन्याची चाहूल लागली नाही. तेवढ्यात बजाप्पा तंबाखूवर चुना चोळत समोर आला. मन्याला शोधताय जनु.. असे म्हणाला. काका हो म्हणाला. तेव्हा बजाप्पा म्हणाला, मी आत्ता पेठंतनंच आलुया.. तीतं न्हाई तो दिसला. पर मगाशी कडुसं पडायच्या आदी एकटाच डव्हाकडं पळत सुटलेला दिसला हुता मला..! म्या इचारलं बी हुतं.. पर काईच बोलला नवता! 


     हे ऐकताच काकाचे धाबे दणाणले. त्याच्या सवंगड्यांना हाका मारत तो पळत सुटला. त्याच्या मागे पोरं पळत वाड्यात आली.. काय झालं करत! 


आजोबांना बजाप्पा काय म्हणाला ते सांगत त्याने कंदिल उचलला. शेजारच्या माईकडून बॅटरी घेतली. घरातली बॅटरी खिशात घातली आणि लांबडा कासरा घेऊन तो पोरांनी बोलवलेल्या ट्रॅक्समध्ये बसला. पोरं पण पटाटा बसली अन ट्रॅक्स डोहाच्या दिशेने धावू लागली.....क्रमश:




#डोह2


      डोहाजवळ येईपर्यंत कुणाच्याच जीवात जीव नव्हता. ट्रॅक्समधून उतरुन कंदील व बॅटरीच्या प्रकाशझोतात सगळे मन्याला हाका मारत डोहाजवळ पोहोचले. तर डोहाजवळ पडलेले मन्याचे कपडे व टाॅवेल दिसला. मग तर काकाच्या मनाचा ठावच सुटला. तो धावत डोहाच्या भवतीने मन्या मन्या करत वेड्यासारखा धावू लागला. डोहातील पाण्यात बॅटरीच्या प्रकाशझोतात काही दिसतेय का ते पहाण्याचा पोरांनी प्रयत्न केला, पण काहीच दिसले नाही. अशुभाच्या शंकेने सर्वजण भयभीत झाले. 


    पोरे जवळपासचा परिसर बॅटरीच्या उजेडात न्याहाळू लागली. अन तेवढ्यात  चिंचेच्या झाडाखाली एका पोराला काहीतरी दिसले म्हणून प्रकाशाचा झोत तिकडे वळवला तर चिंचेच्या झाडाखाली मन्या पडला होता. ते पहाताच ते पोरगं जोरात ओरडलं.. सापडला सापडला.. मग त्या दिशेने सगळेजण धावत सुटले. तर झाडाखाली बेशुद्ध अवस्थेत मन्या पडला होता. पोरांनी कसलीच वाट न बघता मन्याला उचलला व ट्रॅक्समध्ये मधल्या सीटवर आणून टाकला, आणि गाडी सरकारी दवाखान्याच्या दिशेने सुसाट धावू लागली. डॉ. नी मन्याला तपासले, इंजेक्शन देण्यासाठी सिरींज उचलली हे बघून काकाने मोठ्याने मन्या अशी हाक मारत हंबरडा फोडला. ते ऐकून डॉ. म्हणाले, अहो, तो फक्त बेशुद्ध अवस्थेत आहे. तुम्ही का रडताय? पण डॉ. नी उचललेली सिरींज पाहून मन्या अजून तरी सुखरुप आहे हे समजून काकाच्या मनावरील ताण कमी झाला होता व तो ताण मन्या असा हंबरडा फोडून बाहेर पडला होता. 


    अर्ध्या पाऊण तासात मन्याने डोळे उघडले. हे पहाताच सर्वांनी एकच कल्ला केला. डॉ. नी दटावले म्हणून सगळे गप्प बसले. मग काही औषधे देऊन डॉ. नी मन्याला घरी घेऊन जायला सांगितले.




    एव्हाना मन्या सापडलाय हे वाड्यात समजले होतेच. वाड्यातील व गावातील शेजापाजारी सगळे सोप्यावर येऊन बसले होते.बायकांची आतल्या बाजूला बसून हीच चर्चा चालली होती की, बया..ह्ये पोरगं तिन्हीसांजंच एकटंच कसं गेलं डव्हाकडं..अन तुमी कसं जाऊ दिलासा..आईबा मम्हईला हायत मंग आपुन नकं का ध्यान ठेवाया...हे ऐकून आधीच काळजीने अर्धमेली झालेली काकी अजूनच घाबरली व तीने रडायला सुरवात केली.आज्जीने तिला दटावले..ए बया..गप की! तुला का झालं आता नरडं काढाया..देवा भैरोबा राखनंचा कवल आजच दिलायस ना.. मंग सा़ंभाळ लेकराला...असे म्हणाली व हात जोडले. 


   अण्णाआजोबांना मनोजला पाहिल्याशिवाय चैन पडणार नव्हता.त्यामुळे सोप्यावर चाललेल्या चर्चेत ते फक्त हा हू करत होते. एवढ्यात गाडीचा आवाज  आला व पोरे मनोजला धरुन आत घेऊन आली. त्याबरोबर त्याच्या भोवती कोंडाळे पडले व प्रत्येक जण विचारु लागला, कुटं होतास पोरा.. हा कलकलाट ऐकून अण्णा मोठ्याने ओरडून म्हणाले, चला, आता बघितले ना पोराला.. जावा आपापल्या घरी. त्येला जरा शांतवानी बसू द्या. सगळे पांगले तसे काकीने पाणी आणून दिले. मनोज कुठेतरी शुन्यात नजर लावून बसला होता. काकीने ग्लास समोर धरला व त्याला  खांद्याला धरुन हलवले त्याबरोबर त्याने तिच्या हाताला रागाने जोरात हिसडा दिला व पाण्याचा ग्लास जोरात भिरकावून दिला. काकी एकदम घाबरली व त्याच्याकडे सगळेच पाहू लागले. तोपर्यंत काकाने आजोबांना तो कुठे सापडला, कसा सापडला हे सांगितले होते. हे कायतरी वेगळेच चरिंतर दिसतेय हे अण्णा आजोबांना समजले. अण्णांनी काकाला सांगितले की, आत्ताच्या आत्ता जाऊन हरिकाकाला घेऊन ये. आन त्याला सांग की ह्ये पोरगं डव्हावर एकलंच गेलं हुतं अन चीचंखाली घावलं. काका क्षणार्धात उठला व हरिकाकाच्या घराच्या दिशेने चालू लागला... क्रमशः




#डोह3




हरिकाका ओ हरिकाका अशा हाका मारतच काका अंगणात ऊभा राहिला. रात्रीचे कोण आलेय हे पहायला हरिकाका बाहेर आले तर समोर काका ऊभा! मग अण्णांनी सांगितल्याप्रमाणे काकाने सगळा घडलेला प्रसंग सांगितला व लौकर घरी चला असे सांगितले. हरिकाका पाच मिनिटे थांब म्हणाले व आत घरात गेले. परत आले तेव्हा त्यांच्या हातात एक पिशवी होती, खांद्यावर घोंगडे होते व हातात वेताची काठी! दोघांनी झपाझपा चालायला सुरवात केली. 




इकडे काका घराबाहेर पडताच मन्या रागाने खाऊ की गिळू अशा नजरेने सगळीकडे पाहू लागला. अण्णांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. काकी, आज्जी आत बसून बाहेर काय चालले आहे ते पहात होत्या.एवढ्यात मनोज उठला व सोप्यात ठेवलेला सागवानी माचा त्याने एका हाताने एका बाजूने उचलला. आजोबा पटकन उठले,पण त्याने एकाच हाताने तो वजनदार माचा एवढ्या शक्तीनिशी आपटला की अक्षरशः त्याचे तुटून तुकडे झाले. हा जोरदार आवाज ऐकून वाड्यातील सगळेजण धावत आले. तर मनोज रागाने थरथरत उभा होता व सभोवती लाकडी माचाचे तुकडे विखुरले होते. सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. 


मनोज म्हणाला, विसरलात एवढ्यात मला! पण मी विसरले नाही. खूप वाट पहावी लागली मला झाड मिळण्यासाठी... पण आज संधी मिळाली मला.मनोजच्या तोंडून हे उद्गार ऐकून सर्वजण बुचकळ्यात पडले. आपल्या घरातील जुनीजाणती लोकं डोहाकडे एकटेदुकटे तसेच तिन्हीसांजेला, अमुश्या-पुनव़ंला जायचं नाही अशी बजावत आली होती, त्यामागचे कारण माहिती नसले तरी सर्वजण ते तंतोतंत पालन करत होते. आज पहिल्यांदाच  अनवधानाने त्या आज्ञेचे मनोजकडून उल्लंघन झाले होते. आणि त्याचा परिणाम समोर दिसत होता. आता पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याचा कुणीच अंदाज बांधू शकत नव्हते. 




मला अंडी पायजेत. आणा लौकर... अन भात पण आणा. भूक लागलीय मला..असे मनोजच्या तोंडून ऐकताच  आजोबांनी घरात शिल्लक असलेला भात व घरात असलेली कच्ची अंडी एका ताटात भरुन मनोजसमोर आणून ठेवली. ते पहाताच त्याने दोन्ही हातांनी गपागपा भात व कच्चीच अंडी खायला सुरुवात केली. हे खूप किळसवाणे दिसत होते. 




तोपर्यंत हरिकाकांना घेऊन काका घरी पोचला. हरिकाकांनी मनोजकडे पाहिले व हातातील वेताची काठी जमिनीवर एका ठराविक लयीत तीनदा आपटली. त्याबरोबर मनोजने वर पाहिले व काकाच्या अंगावर धावून गेला. काका हरिकाकांच्या मागे लपला. पण मग हरिकाकांच्या जवळ मात्र मनोज गेला नाही. हरिकाकांनी घोंगडे झटकले, अंगणात मधोमध  अंथरले व त्यावर ते बसले. शेजारी वेताची काठी ठेवली. मग पिशवीतून एकेक वस्तू बाहेर काढून ते मांडू लागले. ते पाहून मनोजची तगमग होऊ लागली.




काकांनी मग एक रिंगण आखले व बाटलीतील तीर्थ मनोजच्या अंगावर शिंपडले व नंतर त्याला रिंगणात बसायची आज्ञा दिली. तो रागारागाने हातपाय आपटत पुढे आला व रिंगणात बसला. हरिकाकांनी येडोबाच्या नावाने चांगभलं चा जोरात गजर केला व गुलाल हवेत उधळला. त्याबरोबर मनोजला सर्वांगाची आग होत असल्याची जाणीव झाली व तो हातपाय चोळू लागला. 


सांग का धरलेस झाडाला.. तुला निवद, दरसाल कोंबडं पोच हुतं का न्हाई. मग का आलीस इथवर? बोल लौकर.. आणि त्यांनी जमिनीवरच वेताची काठी आपटली. 


त्यावर तिन्हीसांजेला डोहावर माझेच राज्य असते. तिकडे कुणीही फिरकायचे नाही असं ठरलं होतं ना.. मग का आला हा तिकडे? असे मनोजच्या तोंडून उद्गार आले. चुकून तरी कधी मी दिलेले वचन मोडले का आजवर? मी कुणाला त्रास दिला का? मग माझ्या वेळेत डोहावर येऊन माझ्या विश्वात ढवळाढवळ करुनही मी शांतच बसायचे का? 




अगं पोरगं नवीन हाय. कदीमदीच येतं. त्याला ठावं असलं तरी इसारलं असंल.  असे हरिकाका म्हणाले, पण


यावर काहीच प्रतिक्रिया आली नाही. अण्णा म्हणाले, याच घरातील एक व्यक्ती होतीस ना तू.. मग याच घराचा सर्वनाश करायला निघालीस. यावर मनोजने हुंदके द्यायला सुरुवात केली. 




अण्णांच्या वडिलांची दोन लग्ने झाली होती. पहिल्या पत्नीस मुलबाळ होत नाही हे पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांचे दुसरे लग्न करुन दिले होते. सवत आल्यापासून पहिली पत्नी गप्प गप्प असे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लग्नानंतर सहा महिन्यात पहिल्या बायकोलाच दिवस गेले व घरात सर्वांना खूप आनंद झाला. ती पण खूप आनंदी होती. अन एक दिवस रानात कालवणासाठी भाजी आणायला गेली असताना येताना डोहाजवळचे चिंचेचे झाड दिसले. गाभुळलेल्या चिंचा पाहून तिच्या तोंडाला पाणी सुटले. पण आसपास कुणीच नव्हते. झाड जास्त उंच नव्हते, मग तीच झाडावर चढली अन चिंचा तोडून खाऊ लागली. त्या नादात तोल जाऊन खाली कधी पडलो ते तिला समजले पण नाही. पण खाली पडताच तिला खूप वेदना होऊ लागल्या. पण जवळपास कुणीच नसल्याने पाणी पाणी करत तीने जीव सोडला. दोन हाताच्या अंतरावर डोह होता, पण तरीही तीच्या मुखात शेवटच्या क्षणी चार थेंब पण पडले नाहीत. 




त्यानंतर त्या डोहाकडे जाणेच लोकांनी टाळले. कुणाकुणाला ती संध्याकाळी डोहावर बसलेली दिसली तेव्हा हरिकाकांच्या वडिलांनीच तिला  निवद कोंबडं देण्याची पद्धत सुरू करुन तिला कुणाला त्रास द्यायचा नाही याची सक्त ताकीद दिली होती. तेव्हा तिने सांगितले होते की, तिन्हीसांजेनंतर तिकडे कुणी फिरकायचे नाही. आजवर हा नियम सर्वांनी पाळला होता, पण आज मनोज पाण्यात डुंबण्याच्या मोहापायी अण्णा आजोबांनी दिलेली ताकीद विसरला होता व हाच क्षण तीने बरोबर पकडला होता.




हरिकाकांचे मंत्रपठण सुरु होते, सोबतच ते अधूनमधून मंतरलेले तीर्थ मनोजच्या अंगावर शिंपडत होते. आणि त्यांनी तिला विचारले, शेवटचे विचारतोय, बऱ्या बोलाने जातेयस का नाही? यावर मनोजने मान हलवली व जोरात मान गरागरा फिरवून हाताचे तळवे जमिनीवर जोरात आपटले.  आणि अण्णा आजोबांकडे  नजर टाकली. त्या नजरेत काय होते...त्या नजरेत न उपभोगता आलेल्या अपूर्ण मातृत्वाचे झरे वाहात होते. मनोजच्या डोळ्यांच्या माध्यमातून ही अपूर्ण राहिलेली मातृत्वाची अभिलाषा तिने अण्णांकडे , आपल्या सावत्र पुत्राकडे पाहून पूर्ण करून घेतली. हरिकाकाकडे पाहून मनोजच्या मुखातून ती बोलली, बाईच्या जन्माचे सार्थक आई होण्यातच असते.पोटातील मुलाच्या जन्माआधीच मृत्यू पावल्याने तिची अपूर्ण राहिलेली ममता आज अंशरुपाने का होईना पूर्ण झाली.आता मी मुक्त व्हायला मोकळी झाले.अन् पुढच्याच क्षणी मनोजच्या शरीराला जोराचा झटका बसला व तो जमिनीवर निपचित पडला. हरिकाकांनी मनोजच्या तोंडावर गंगाजल शिंपडले. तो जागृतावस्थेत आला.सर्वांना हायसे वाटले.येडोबाच्या नावाने चांगभलं... असा सर्वांनी आनंदाने जोरात गजर केला. 


त्या

नंतर डोहावर जाण्यासाठी वेळेचे बंधन दूर झाले.


समाप्त..©️सौ. हेमा पाटील.


तळटीप - सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक आहे.


Comments

Popular posts from this blog

वर्षाव शुभेच्छांचा

समज

रिती ओंजळ