अभंग विवेचन

 अभंग विवेचन 


©® सौ.हेमा पाटील.


नाम तेंचि रुप ,रुप तेंचि नाम |

नामारुप भिन्न नाहीं नाहीं ||१||


आकारला देव नामरुपा आला |

म्हणोनी स्थापिलें नामवेदीं ||२||


नामापरता मंत्र नाही हो आणिक |

सांगती ते मूर्ख ज्ञानहीन ||३||


नामा म्हणें नाम केशव केवळ |

जाणती प्रेमळ भक्त भले ||४||

      संत नामदेव महाराज


भगवंताचे नाम घेतले की रुप समोर येते.किंबहुना साधनेला सुरवात केली की, नामस्मरण जप करताना त्या भगवंताची मूर्ती डोळ्यांसमोर आणली की मनात भाव निर्माण होतो. व नामस्मरण जप अधिक उत्तम पद्धतीने होतो.विठ्ठलाचे नाम घेतले की विठ्ठलाचीच साजिरी मूर्ती डोळ्यांसमोर येते.रामाचे नाम मुखी घेतले तर रामाचीच मूर्ती दिसते.पण नाम हेच रुप आहे,अन रुप हेच नाम आहे.दोन्हींत अभिन्नता आहे.


उत्पत्ती, स्थिती आणि लय यासाठी ब्रम्हदेव,श्री विष्णू व भगवान शंकर यांची योजना केली गेली आहे.आपण रस्त्याने सहज चालत असताना इकडे तिकडे पाहिले तर रस्त्याच्या कडेला दगडांना शेंदूर फासून अनेक देवांची स्थापना केलेली दिसते.गमतीची गोष्ट लहान असताना असा कुठलाही देव अगर मंदीर दिसले की मी हात जोडायचेच.हात जोडून नमस्कार केला नाही तर देव रागावेल अशी मनात कल्पना असायची.कालांतराने असे हात जोडणे आणि भक्ती यातील फरक समजायला लागल्यावर हे नमस्कार करणे बंद झाले.पण अशीच अवस्था अनेक साधकांची दिसते.आज सोमवार,आज शंकराची उपासना केली पाहिजे,उद्या मंगळवारी देवीची..नाहीतर देवी रागावेल.बुधवारी विठ्ठल, गुरुवारी राम आणि दत्तांसाठी उपवास...मग राम की दत्त ? नेमके कुणासाठी ? हा संभ्रम...याचेच उत्तर संत नामदेव महाराजांनी दिले आहे.


कुठल्याही देवाचे नामस्मरण जप केले तरी शेवटी ते श्री विष्णू यांच्याच चरणी अर्पण होते.मग ते विठ्ठल असो,राम असो,दत्त असो की साई असो...


महत्वाची गोष्ट म्हणजे दररोज देवळात देवाच्या दर्शनासाठी जाण्याचा नेम बर्याच जणांचा असतो.पण देवळात जाऊनही फक्त देवाचे दर्शन घेण्यात समाधान मानले तर देव कसा भेटेल? त्यासाठी त्याला आर्तपणे आळवले पाहिजे.सतत त्याच्या नामाचा जयघोष करत राहिले पाहिजे.


आपल्या चित्तावरील संस्कार फक्त नामजपानेच कमी होतात.यज्ञ,याग,अथवा आपले वेद,पुराणे या सगळ्याचेही सार केशवाचे नामस्मरण जप हाच आहे.माऊलींनी हरिपाठात सुरेख मार्गदर्शन केले आहे.

त्याप्रमाणेच नाम हाच सगळ्यात प्रभावी मंत्र आहे असे नामदेव महाराज सांगतात.याशिवाय वेगळी साधना अगर उपाय कुणी सांगत असेल तर ते मूर्ख व ज्ञानहीन आहेत असेही नामदेव महाराज बिनदिक्कतपणे म्हणतात.

    ‌आपणही आज भक्तीचा जो बाजार मांडलेला आहे तो पहातो.नाम देण्यासाठी पाच दहा हजार रुपये फी आकारली जाते.अन लाईनमध्ये उभे करुन ओळीने नाम दिले जाते.तिथे भक्ताची आध्यात्मिक पात्रता हा मुद्दाच गौण असतो.मग कशी होणार अशा साधकांची आध्यात्मिक उन्नती? यासाठी आधी आपल्याला नेमके काय हवे आहे हे निश्चित करा.आपली फक्त ऐहिक उन्नती व्हावी यासाठी देवाची उपासना करायची आहे की भगवंतप्राप्ती हा उद्देश आहे?


मुळात आपल्या चित्तावरील संस्कार कमी होण्यासाठीच खूप कालावधी जातो.कारण कळते पण वळत नाही अशीच अवस्था असते.संत सांगतायत,पण त्यावर पूर्ण विश्वास ठेवून कृती करण्याची मानसिकता नसते.मनात जर षडरिपू ठाण मांडून बसले असतील,तर भगवंताला कुठे जागा शिल्लक असणार? यासाठी मनात सर्व प्राणीमात्रांसाठी अतीव प्रेमभाव उत्पन्न झाल्याशिवाय भगवंताची मूर्ती हृदयात स्थापित होणार नाही.म्हणून नामदेव महाराज म्हणतात,प्रेमळ भक्तच केशवाच्या नामाची महती जाणतात.©® सौ.हेमा पाटील.

जय जय राम कृष्ण हरि🙏🙏

Comments

Popular posts from this blog

वर्षाव शुभेच्छांचा

समज

रिती ओंजळ