प्रतिक्षा - भाग २
प्रतिक्षा...भाग २
सौ.हेमा पाटील.
पण सस्मितला काहीच उत्तर न देता ती फक्त हसली व तिने घरातील फोन लावला.मावशी मुलांना घेऊन आल्या का हे रोजच्या सवयीने तिने मावशींना विचारले,आवश्यक त्या सूचना दिल्या सस्मितसमोरच..
आणि सस्मितने हळूच एक ग्रिटिंग व एक पिवळे गुलाबाचे फूल तिच्यासमोर धरले.ती पहातच राहिली...
त्याने वृंदाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.कसे रिॲक्ट व्हावे हेच तिला समजत नव्हते.तिचे डोळे भरुन आले.पण ते सस्मितला दिसू नयेत अशी तिची इच्छा होती.त्यामुळे पेन खाली पडल्याचे निमित्त करून ती खाली वाकली व हळूच तिने डोळे टिपले.
"काय मग मॅडम, आता तरी पार्टी देणार का! की आपल्या तेव्हासारख्याच वाटाण्याच्या अक्षता"?..? या त्याच्या वाक्यावर ती खळखळून हसली.तिला आपले काॅलेजलाईफ आठवले.मित्रमैत्रिणींचा गृप आठवला.त्यासोबतच त्यावेळचा सस्मितही डोळ्यांसमोर उभा राहिला.आणि त्यासोबतच अनेक स्मृती ही....
आत्ता सस्मितसमोर ते सगळे आठवण्याचीही तिला भिती वाटली.याला आपल्या मनात काय विचार चालू आहेत हेही समजेल असा विचार करून ती त्या विचारांच्या गुंतवळीतून बाहेर आली.आणि सस्मितला म्हणाली,"होय! देईन ना पार्टी! त्यात काय विशेष? पण आज नाही देऊ शकणार.. येत्या रविवारी ये घरी पल्लवी आणि मुलांना घेऊन".त्यावर हलकेच हसत परत एकदा तिला विश करुन सस्मित जागेवर जाऊन बसला.
पण तिच्या मनात मात्र विचारांनी कोंडी केली.आईबाबा होते तोपर्यंत सकाळी उठल्याउठल्या त्या दोघांचा शुभेच्छा देण्यासाठी फोन यायचाच.पण ते चार वर्षांपूर्वी अॅक्सिडेंट मध्ये गेले..आणि तेव्हापासून शुभेच्छा देण्यासाठी येणारा फोन बंदच झाला....नाही म्हणायला दादावहिनींचा वाॅटस्अपवर शुभेच्छा देणारा मेसेज येतो...पण तेवढाच !आवर्जुन फोन करावा असे त्यांना कधी आत्मियतेने वाटतच नाही याचे तिच्या मनाला खूप वाईट वाटते.व आईबाबांसोबतच आपले माहेर जणू संपले अशीच मनाची समजूत ती दरवेळेस घालून घेते.तशीच आजही तिने समजूत घातली...
पण आकाशचे काय? ....या विचाराने मात्र ती दुखावली.एकदाही माझा वाढदिवस याच्या लक्षात रहात नाही... सकाळी आईबाबांच्या आठवणीने व्याकुळ होऊन ती आईकडूनच आणलेल्या मोगऱ्याच्या वेलीजवळ अंगाभोवती वेल लपेटून उभी होती..जणू आईनेच घातलेली प्रेमळ मिठी..आईचाच स्पर्श ती अनुभवत होती..आणि आकाशने तिला खस्सकन त्यातून बाहेर ओढले होते.हे आठवून तिचे डोळे पुन्हा भरुन आले... सौ. हेमा पाटील.
प्रतिक्षा..भाग ३
आकाश आॅफीसमध्ये धापा टाकतच पोहोचला.त्याने पुन्हा एकदा घड्याळाकडे नजर टाकली.पावणेनऊच झालेत हे पाहून तो सुखावला व चेअरवर टेकला.गाडी आपण आज जरा जास्तच दामटली हे लक्षात आले त्याच्या! त्याच्या मनात विचार आला, वृंदामुळेच आज उशीर झाला... ही वृंदा पण ना! कामे वेळेवर करायची सोडून काय सकासकाळी त्या वेलीजवळ घुटमळत असते कुणास ठाऊक!...
महादूने पाणी आणले होते त्याचा एक घोट घेत त्याने महादूला काॅफी आणायला फर्मावले. त्याच्या लक्षात आले की ,आज आपण वर येताना गडबडीत साईंच्या मूर्तीला नमस्कार करायला विसरलो.मग त्याने खुर्चीत बसल्याबसल्याच डोळे मिटून साईंना वंदन केले व महादूने आणलेल्या काॅफीचा तो आस्वाद घेऊ लागला.पहिला घोट घेताच त्याच्या चेहऱ्यावर जे भाव उमटले ते पाहून महादूच्या लक्षात आले,काॅफी जमलीय नेहमीसारखीच..मग तो गालातल्या गालात हसत बाहेर पडला.
आकाश कंपनीचा मालक होता.त्यामुळे त्याला वेळ पाळलीच पाहिजे असे बंधन नव्हते.पण त्यालाच ते आवडत नसे. पाच वर्षे झाली स्वत:ची कंपनी सुरू करुन, त्यापूर्वी तो एका मल्टीनॅशनल कंपनीत कामाला होता. तिथेही त्याने पंधरा मिनिटे आधी पोहोचण्याची सवय कसोशीने पाळली होती.बालपणी झालेले संस्कार आजही तो घट्ट धरुन होता या गोष्टीचा त्याला अभिमान होता. शाळेत असताना त्याच्या आवडत्या सौ.उकिडवे मॅडमचे वेळेबाबतीतील एक वाक्य तो आजही विसरला नव्हता.." जर वेळेची शिस्त पाळता येत नसेल तर त्या मनगटावर बांधलेल्या चुन्याच्या डब्या काढून फेकून द्या".....आकाश वेळ पाळण्यात अगदी काटेकोर होता.त्याला त्याचा अभिमान वाटतो इथपर्यंत ठीक होते,पण आता त्याचा अभिमान अहंकारात रुपांतरीत झाला आहे याची त्याला जाणीवच नव्हती.वेळ पाळण्याचे त्याला जणू व्यसनच लागले होते.
धावतपळत साईंना नमस्कार करायचे विसरुन आॅफीसमध्ये आलो याचे शल्य मनात असतानाच मोबाईल मध्ये रिमाईंडर वाजला.सकाळपासून मोबाईल कडे त्याने रोजच्यासारखेच ढुंकूनही पाहिले नव्हते.त्याने मोबाईल हातात घेतला आणि तो उडालाच...ohh no..my god... मोबाईल वृंदाचा वाढदिवस असल्याची आठवण करुन देत होता.
सईने दोनच महिन्यांपूर्वी घरातील सर्वांच्या वाढदिवसाचे रिमाईंडर त्याच्या मोबाईलवर लावले होते हे सांगत..की,"बाबा,कसा रे असा तू? साधे वाढदिवस लक्षात रहात नाहीत तुझ्या?आणि आॅफीसमध्ये महत्वाच्या मिटींग्ज कधी आहेत हे कसे लक्षात रहाते रे तुझ्या"? क्रमश: सौ.हेमा पाटील.
दिनांक १८/७/२०२४
Comments
Post a Comment