शिष्टाचार अर्थात मॅनर्स

 शिष्टाचार अर्थात मॅनर्स 


सौ.हेमा पाटील.


    मॅनर्स  चार माणसांत पाळायचेच असतात.म्हणजे तुम्हाला मान्य असो की नसो..काल याची प्रकर्षांने जाणीव झाली.हे वाचून तुम्हीही म्हणाल खरं आहे म्हणून...,पण शिष्टाचार म्हणजे नेमके काय याचाही बोध झाला हे ही नसे थोडके!


फ्लाईट मध्ये साडेचार हजार फुटांवरून  प्लेन चाललेले असताना आणि आतील एसी चालू असताना ..त्यात माझ्यासारख्या नवख्या माणसाला तर जास्तच थंडी वाजणार यात शंकाच नाही.तर अशा थंडावलेल्या अवस्थेत असताना जेवण आले.जेवण आल्यावर ते ठेवण्यासाठी सीट समोर टेबल असते. ते आधीच छोटे असते त्यामुळे जेवणाचा ट्रे ठेवल्यावर जपूनच जेवावे लागते. शेजारी एक भारतीय महिलाच बसली होती,पण ती कार्पोरेट क्षेत्रात कार्यरत असणारी असावी.

 झाले काय, जेवण म्हणजे छोट्या चार वर्षांच्या मुलाला पुरणार नाही एवढासा चार घासांचा भात आणि भाजी जेवण म्हणून समोर आली होती. ते खरंच चार घासातच संपले.भूक लागली होती म्हणून सोबत दिलेला ब्रेड बटर लावून खावा म्हणून ब्रेडवरचे प्लास्टिकचे आवरण फोडण्याचा प्रयत्न करत होते. ते लेकाचे इतके हट्टी की फुटायचे नाव घेईना..सगळ्या दिशांनी जागा बदलून फोडण्याचा प्रयत्न केला,पण परिणाम शून्य! घरात असते तर कात्रीने, आणि कात्री सापडली नसती तर  सरळ दातांनी फोडले असते,पण बाहेर चार माणसांत बरे दिसत नाही ना असे.. शिष्टाचार पाळावे लागतात.. ते आवरण फुटेना, अन् चार घास खाल्याने भूक चाळवली होती म्हणून जरासा जोर लावून आवरण फोडायचा प्रयत्न केला तशी हाताचा धक्का लागून पाण्याची बाटली पटकन खाली पडली..ही बाटली पण इनमीन दोनशे मिलीलिटरची...जशी काही ती वाटच बघत होती,कुणाचा जरासा धक्का कधी लागतोय अन् मी खाली कधी पडतेय..ती बया आपली आरामात खाली विसावली..पण बाटली जशी खाली पडली तसे शेजारी  बसलेल्या महिलेने टककन माझ्याकडे पाहिले.काय सांगू त्या एका क्षणभराच्या नजरेतून तिने मला काय काय दर्शवले? कजरारे कजरारे तेरे कारे कारे नैना..म्हणत नाचणारी ऐश्वर्या आपल्या हावभावांतून समोरच्या बद्दलचे भाव दर्शवते.पण या बाईने एका नजरेनेच माझा असा पाणउतारा केला की, अशा इंटरनॅशनल फ्लाईट मधून प्रवास करण्यास तुम्ही लायक नाही आहात...


एक अक्षरही न बोलता फक्त नजरेने व्यक्त होणाऱ्या माणसांबद्दल मला प्रचंड आदर आहे.या माणसांना त्याच त्या डोळ्यांच्या माध्यमातून इतके वेगवेगळे भाव दर्शवणे कसं काय जमतं बुवा याचे मला कौतुक वाटते.पण आत्ताची परिस्थिती वेगळी होती.भूक तर लागली होती,ब्रेडवरचा प्लास्टिकचा कागद फुटायचे नाही असा निर्धार केल्यासारखा ताठला होता..अन् आधीच भुकेने व्याकुळ झालेल्या माझी  शेजारणीच्या नजरेने मार डाला मार डाला अशी अवस्था झाली.भूक तर क्षणातच विरुन गेली.त्यात आपल्यावर दिडशे वर्ष राज्य करणाऱ्या आणि आपल्याला हे असले शिष्टाचार शिकवणाऱ्या इंग्रजांच्या इलाक्यातच ही गोष्ट घडल्याने अधिकच वाईट वाटले.मग तो ब्रेड आणि ते बटर तसेच राहिले..तो ब्रेड माझ्याकडे पहात छद्मीपणे हसतोय असा भास झाला.


शेतात गेल्यावर पाटाच्या पाण्यात मातीने भरलेले हात धुवून त्याच हातावर भाकरी घेऊन त्यावर एकमेकींच्या डब्यातील भाजी घेऊन खाणाऱ्या आम्ही गावाकडच्या बायका खरंच सुखी असे वाटले.त्याचवेळी एक खोडकर विचार मनात डोकावून गेला..हे एवढेसे जेवण घेऊन जर  शेतकरी महिलांसोबत मी शेतात काम करत असताना जेवायला गेले असते तर त्या म्हणाल्या असत्या," ताई,आज डबा बनवला नाही का? असु देत, आमच्यासोबत जेवा.अच्च्याने एक घास दिला बच्च्याने एक घास दिला की तुमचे पोटच भरुन जाईल"...ही आमच्या ग्रामीण भागातील एक म्हण आहे,जसे एक तीळ सात जणांनी वाटून खावा..तसे एखाद्या दिवशी एखाद्या महिलेला डबा आणणे जमले नाही तर ती उपाशी रहात नाही.सगळ्यांच्या जेवणाच्या डब्यांमध्ये तिचे पोट भरते.आपल्यासोबत असणारे कुणी उपाशी राहू नये हा ग्रामीण, कमी शिकलेल्या महिलांचा शिष्टाचार मला अधिक श्रेष्ठ वाटला आणि हर फिक्र को धुॅंवे में उडाता चला गया...या देव आनंद यांच्या गाण्याप्रमाणे मी शेजारणीची ती नजर फाट्यावर मारत सरळ दातांनी ब्रेडचे आवरण फोडले व आरामात बटर लावून खाल्ला.खाऊन झाल्यावर क्रूकडे पाण्याची दुसरी बाटली मागितली व पाणी पिऊन थंडगार झाले... खऱ्याखुऱ्या शिष्टाचाराने  बेगडी मॅनर्सवर मात केली होती..इति हेमा उवाच..सौ.हेमा पाटील.

१४/६/२०२४

Comments

Popular posts from this blog

वर्षाव शुभेच्छांचा

समज

रिती ओंजळ