गारवा

 गारवा


©️सौ. हेमा पाटील.


    बायकोने हातात आणून दिलेल्या चहाचे घुटके घेत तो आरामात टीव्हीवरील बातम्या पहात होता. सकाळीच  आवडीचा ब्रेकफास्ट मिळाल्याने जिव्हेचे व मनाचेही समाधान झाले होते, त्या समाधानाची दुलई ओढून तो अंमळ सुखावून टीव्हीसमोर बसला होता. 


  आतमध्ये बायकोची काहीतरी खुडबुड चालली होती. शक्यतो यावेळेपर्यंत दररोज तिची घरकामे उरकलेली असतात व दारात ऊभे राहून शेजारणीसोबत आपल्याला प्राप्त झालेल्या माहितीचे आदानप्रदान करणे अतिशय आवडीने चालू असते. पण आज अजूनही आतला आवाज थांबेना म्हणून त्याने विचारले, "काय करतेयस गं"...? यावर आतून काहीच आवाज आला नाही, तेव्हा तो उठून चहाचा कपही आत ठेवावा व प्रत्यक्षच तिचे काय चालले आहे ते पाहून येऊया असे म्हणत आत किचनमध्ये गेला. तर तांदूळ, साखरेचे डबे, हळदीकुंकवाच्या पुड्या, भस्म, अगरबत्ती, माचिस अन अजून काय काय सभोवती घेऊन ती बसली होती. त्याने विचारले, "हे काय"? यावर तिने फक्त हुं s केले. पण त्याला काहीच समजले नाही. त्याने चहाचा कप बेसीनजवळ ठेवला व पुन्हा तोच प्रश्न विचारला. त्यावर ती म्हणाली, "दिसतेय ना... तुम्हांला काय माहित असते म्हणा? आज त्रिपुरारी पोर्णिमा आहे, शंकराच्या मंदिरात जायचे आहे. त्याची तयारी करतेय". 

"आत्ता जाणार आहेस"? यावर गाल फुगवत ती उत्तरली," हो...! संध्याकाळी किती गर्दी होते! साधे डोके टेकवायला पण जमत नाही. मला तिथे 108 बेलाची पाने नामस्मरण करत वहायची आहेत. दरवर्षी मी दुपारीच जाते, यावेळी तुम्ही घरी आहात, म्हणून विचारताय.नाहीतर तुम्हाला काय माहित असते"? 


हे ऐकल्यावर तो म्हणाला, "अगं, एकटी कशी जाशील? मंदिर तर गावाबाहेर आहे. यावेळी तिथे कुणीही नसेल. तिथे मंदिराभोवती किती अडचण आहे! चल मी पण येतो तुझ्या सोबत"...! हे शब्द ऐकून तिचा आपल्या कानांवर विश्वास बसेना.पण तिला आनंद झाला हे तिच्या फुललेल्या चेहऱ्यावरुन त्याला दिसले. 


मग साहित्याची पिशवी व पाण्याची घागर घेऊन त्याने तिच्यासोबत मंदिराची वाट धरली. मंदिरात गेल्यावर शंकराच्या पिंडीला वाकून नमस्कार करुन तो गाभाऱ्याच्या बाहेर पडून मंदिराच्या  प्रवेशदारापाशी बसला. आत बायकोची साग्रसंगीत पूजा,मंदिराच्या शांत वातावरणात

||ॐनम: शिवाय || उच्चारणाचा धीरगंभीर आवाज घुमत होता. तो फारसा देवदेव करणारा नसूनही आज मात्र त्याला हे सगळे पाहून ऐकून छान वाटत होते. कारण बायको हे मनापासून करत होती, अन तिच्या आनंदी असण्याने त्याला आनंद झाला होता.


 शंकराचे अर्धनारीनटेश्वराचे रुप त्याच्या नजरेसमोर आले, अन आपण फक्त आपण नसून आपल्या आत असणारे शक्तीचे अस्तित्व त्याला जाणवले, जे आपण कधीही आपल्यापासून दूर करु शकत नाही हेही त्याला समजले की, शिव आणि शक्ती वेगळी भासत असली तरीही दोघांच्या मीलनातच सत्यता आहे.


 ‌आत धीरगंभीर उच्चारात नामस्मरण व बेलार्चन सुरु होते, अन अभिषेकाचा गारवा मात्र याच्या हृदयात खोलवर झिरपत होता....

©️सौ. हेमा पाटील.

Comments

Popular posts from this blog

वर्षाव शुभेच्छांचा

समज

रिती ओंजळ