स्वामित्व

 जरा मनातलं बोलुयात या फेसबुक गृपच्या शब्दसुमने या विशेषांकात छापून आलेली ही माझ्या आध्यात्मिक लेखांहून सर्वस्वी वेगळी अशी लिहिलेली पहिलीच कथा... कुठल्याही पहिल्या गोष्टीचे कौतुक जास्त असते.तशी ही माझी आवडती कथा !धन्यवाद अंजुताई, वेगळे काही लिहिण्यासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल 👍☺


           स्वामित्व

©️सौ. हेमा पाटील.


   विनी.. ऐ विनी! अजूनही आवरले नाही तुझे? किती बजावून सांगितले होते मी सकाळी, मी कंपनीतून निघताना फोन केला होता.. तरीही अजून तयार नाहीस? 

        बाथरुममधून डोक्याला टाॅवेल गुंडाळून विनी बाहेर पडली तर घरात रोहनचा दंगा सुरु होता. अरे, हो हो..! झालेच आहे सगळे! सगळी कामे आटोपून मगच मी बाथ घ्यायला गेले होते. आता माझ्या फ्रेश मूडला घालवू नकोस हं... चल, बॅगा गाडीत भरायला घे. मी तोपर्यंत एकदा घरात सगळीकडे चेक करते काही राहिले आहे का? 

   ती सगळीकडून चेक करत शेवटी देवघरात आली. तिथले मंद दिव्याचे बटन तिने सुरुच ठेवले व देवासमोर बसून तिने हळदीकुंकू वाहिले आणि स्वत:लाही हळदीकुंकू लावून घेतले. डोळे मिटून तिने मनोमन नमस्कार केला. डोळे उघडून समोर पाहिले तर देवापुढे लावलेल्या निरंजनाची ज्योत थरथरतेय असे तिला जाणवले. मनात अशुभ शंका डोकावली, पण देवाला पुन्हा एकदा नमस्कार करत चला देवा तुम्ही ही आमच्यासोबत... असे म्हणत ती उठली. 

    बाहेर आली तर रोहनचे डिक्कीत सगळे सामान ठेवून झाले होते. फक्त पाण्याच्या बाॅटल भरायच्या राहिल्या होत्या.

   बाॅटल्स घेऊन दाराला लाॅक लावून दोघे गाडीकडे चालू लागले. विनीने न राहवून मागे वळून घराकडे कटाक्ष टाकला. सारखे घरात राहून कंटाळा आला रे.. चल ना जाऊ कुठे तरी चेंज म्हणून, असे म्हणत तीच तर मागे लागली होती रोहनच्या... अन आता मात्र घर सोडून जाताना मन कातर झाले होते, त्यात ती दिव्याची थरथरणारी ज्योत समोर दिसत होती.घर दिसेनासे होईपर्यंत ती घराकडेच पहात होती... 

         रोहन मात्र मस्त एंजाॅयच्या मूडमध्ये होता. त्याने गाणी लावली अन गाडी मुंबईहून महाबळेश्वरच्या दिशेने धावू लागली.दुपारची वेळ असल्याने रस्त्यावर ट्राफिक लागले नाही जास्त. लोणावळा कधी आला समजले पण नाही. तिथे चहा अन थोडेसे खाऊन ते पुढे निघाले. हाॅटेलचे बुकींग आधीच केलेले होते.वाईमध्ये ढोल्या गणपतीचे व काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन झाल्यावर तिथल्या कृष्णामाईच्या घाटावर पाण्यात पाय बुडवून आपल्याच तंद्रीत बसलेल्या विनीला चल.. ऊठ म्हणायचे रोहनच्या जीवावर आले. तो ही मग तिथेच शेजारी बसला. पश्चिमेला सुर्यदेव आपल्या घरी जाण्याची तयारी करत होते ते विलोभनीय दृश्य पहाण्यात रोहनही हरवून गेला. विनीनेच त्याला हाक मारुन त्याची तंद्री मोडली. दोघेही उठून गाडीकडे निघाले. मंदिरात जाताना पुजेचे घेतलेले ताट दुकानात परत देताना दुकानदाराने मंदिरात फोडलेल्या नारळाची अर्धी वाटी, पेढे व मंदिरातील पुजार्याने दिलेला अंगारा, अष्टगंध पिशवीत घालून विनीच्या हातात दिले. तिने ती पिशवी पर्समध्ये टाकली. 

    गाडी पाचगणीच्या दिशेने पसरणीच्या घाटातून धावू लागली.बुवासाहेबाचे मंदिर मागे पडले अन तिन्हीसांज झाली. अगदी निर्मनुष्य वाटावा असा घाट, उंचच उंच झाडांच्या अंधूक प्रकाशात दिसणार्या वेड्यावाकड्या सावल्या, सभोवताली अंधाराचे साम्राज्य, अन या अंधाराला कापत रोहनच्या गाडीचा चाललेला प्रवास! जणूकाही सभोवतालचे सगळे जग स्तब्ध झाले आहे,ना एखादा पक्षी ओरडतोय ना एखादा प्राणी!माणूस तर दूरच! 

सुरवातीला विनीला फारसे वावगे वाटले नाही. तसे तर फक्त आठच वाजतायत आत्ताशी.. नऊ वाजेपर्यंत पोहोचू आपण हाॅटेलवर! असा विचार करून ती सीटवर शांतपणे डोके मागे टेकवून सभोवतालच्या शांततेची अनुभूती घेत होती. 


असाच किती वेळ गेला समजेना.... अजून आपण कसे पोहोचलो नाही? किमान पाचगणी तरी एव्हाना यायला हवी होती असे वाटून तिने मोबाईलमधील घड्याळात किती वाजले ते पाहिले. आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. मोबाईल मध्ये आठच वाजल्याचे दिसत होते. आपण गाडीने नक्कीच पाऊणतास तरी प्रवास केलाय हे तिला जाणवले.तिने रोहनकडे पाहिले, तर तो गाणी ऐकत निवांतपणे गाडी चालवत होता. त्याचा मोबाईल हातात घेऊन तिने त्यातली वेळ पाहिली. तिथेही आठच वाजल्याचे दिसत होते. मग विनी जरा सैलावली. तिला वाटले सकाळी लवकर उठून तयारी सुरु होती, त्यामुळे आपण दमलोय. त्यामुळे आपण जरा शांतपणे डोळे मिटून पडावे. या रस्त्याने काही आपण पहिल्यांदाच येत नाही. वर्षातून दोनदा तर आपण येतोच.रोहन देईल हाक.. तोपर्यंत विश्रांती घ्यावी हेच better...

           सीटवर डोके टेकवून डोळे मिटताच विनीची झोप लागली.तिच्या निरागस दिसणार्या चेहर्याकडे रोहन मधूनच कटाक्ष टाकत होता. तिचे आपल्यावर किती निस्सीम प्रेम आहे हे तो जाणून होता. तिच्यासाठी आपणच तिचे विश्व आहोत हे त्याला माहीत होते.आत्ता या क्षणी तिला बाहुपाशात घ्यावे असे त्याला प्रकर्षाने वाटले. पण तो मोह आवरत त्याने ड्रायव्हिंग वर लक्ष केंद्रित केले. सहजच त्याने मोबाईल वर नजर टाकली. वाई सोडल्यापासून एकही काॅल कसा आला नाही याचे त्याला नवल वाटत होते. आज कंपनीत महत्वाची मिटींग झाली होती, एक महत्वाचे डील आजच होणार होते. त्याबद्दल काॅल येईल याची तो वाट पहात होता. किती वाजले हे त्याने मनगटावरील रिस्टवाॅचमध्ये पाहिले. तर आठ वाजले होते. अजून पाचगणी का आली नाही असा विचार त्याच्या मनात आला.आपण रस्ता तर चुकलो नाही ना? असे क्षणभर त्याला वाटले. पण वाईहून पाचगणीला, महाबळेश्वरला जाणारा एकच सरळ रस्ता आहे हे त्याला माहिती होते, त्यामुळे त्याने तो विचार दूर सारला. आपल्या पीए ला फोन करावा असे वाटून त्याने मोबाईल हातात घेतला व नंबर लावला. पण मोबाईल ला नेटवर्क च नव्हते. समोर बघून गाडी चालवत असताना त्याला सभोवताली दाटलेल्या अंधाराची जाणीव झाली. आणि त्यासोबतच ही पण जाणीव झाली की,घाट सुरू होताना लागणारे बुवासाहेबाचे मंदिर गेल्यापासून घाटात एकही गाडी आपल्याला ना समोरुन क्राॅस झाली आहे, ना ओव्हरटेक करुन गेली आहे. रस्ता तर सरळसोट दिसत होता अंधारात झाडांच्या सावल्या अंगावर मिरवत.... स्तब्ध! 

       

    अचानक गाडीसमोर काहीतरी आले अशी जाणीव झाल्याने रोहनने जोरात ब्रेक्स दाबले, जोरात धक्का बसून गाडी थांबली. त्या धक्क्याने विनी जागी झाली. बघते तर गाडी थांबली आहे. तिला वाटले, हाॅटेलवर आलो आहे, म्हणून अर्धवट झोपेत असलेल्या विनीने गाडीचे दार उघडले व पर्स हातात घेऊन खाली उतरण्यासाठी एक पाय गाडी बाहेर टाकला... अन त्या पायाला बर्फाच्या लादीवर पाय ठेवत आहोत अशी जाणीव झाली व एका झटक्यात विनीची झोप उतरली.तिने बाहेर पाहिले तर किर्र अंधार पसरला होता. गाडीचे हेडलाईट्स चालू होते, तेवढाच काय तो उजेड.... तिला काहीच समजेना. अद्यापही तिच्या बाजूचे गाडीचे दार उघडेच होते. अन एक जीवघेणी थंडगार वार्याची झुळूक तिच्या हाताला स्पर्शून गाडीत शिरली असे तिला जाणवले.

   तिने पटकन गाडीचे दार लावून घेतले. अनोळखी ठिकाणी, अनोळख्या जागी, कातरवेळी व रात्री गाडीतून कधी उतरु नये असे आई सांगायची हे तिला आठवले. आपण मोकळी जागा आहे म्हणून उतरतो, पण त्या जागेवर कुणाचे स्वामित्व आहे हे आपल्याला ठाऊक नसते. ती थंडगार झुळूक आठवून तिचे शरीर शहारले. तिने रोहनकडे पाहिले, तर तो स्तब्धपणे समोर पहात होता. तिने विचारले, आपण रस्ता चुकलोय का? तर रोहनने सांगितले, एकच रस्ता आहे इथे.. मग चुकणार कसा? पण इतका वेळ झाला तरी आपण पोचलो कसे नाही याचेच मला नवल वाटतेय. अन घड्याळ तर आठच वाजल्याचे दाखवतेय. चंद्र तर माथ्यावर आला आहे. हे तो बोलतोय तोवरच त्याला एकदम थंडगार काहीतरी शरीरात प्रवेश करतेय असे जाणवले अन त्याचे शरीर एकदम आखडल्यासारखे झाले. ते पाहून विनीने विचारले, काय झाले? यावर काहीच न बोलता त्याने स्टेअरिंगवर डोके टेकवले. 

    काय करावे हे विनीला समजेना. बाहेर पडले तर धोका आहे. त्याऐवजी गाडीतच बसणे योग्य आहे याची खूणगाठ तिने बांधली, व चल, गाडी सुरू कर असे रोहनला सांगितले. पण काही केल्या गाडीच सुरू होईना... तिने रोहनच्या चेहर्याकडे पाहिले, अन तो रोहन आहे यावर तिचा विश्वासच बसेना! कारण चेहरा जरी रोहनचाच होता तरीही रोहनच्या डोळ्यात जे भाव दिसत होते ते तिला पूर्णपणे अपरिचित होते.जणू दुसरीच कुणीतरी व्यक्ती त्याच्या डोळ्यातून आपल्याकडे वखवखलेल्या नजरेने पहातेय....!असे तिला जाणवले. ती नजर तिला खूप अस्वस्थ करुन गेली. हा आपला रोहन नाहीच....!

 आपण संकटात सापडलो आहोत हे तिला समजले. गाडीतून बाहेर पडणे म्हणजे स्वत: ला संकटात टाकणे, अन गाडीत रोहनची बदललेली नजर... तिला आठवले, आईने कालभैरवाष्टक पाठ करुन घेतले होते , तेव्हा सांगितले होते की, अमानवी संकट कधी सामोरे आलेच तर कालभैरवाष्टक मोठ्याने पठण करायचे. तिने कालभैरवाष्टक पठण सुरू केले, तिच्या बालपणापासूनच पाठ होते ते.. 

जसजसे ती कालभैरवाष्टक पठण करु लागली,तसे रोहन रागाने खाऊ की गिळू अशा नजरेने तिच्याकडे पाहू लागला. तिच्या मांडीवर असलेली तिची पर्स बाहेर फेकून दे असे जोरजोरात ओरडून तिला सांगू लागला.शांत बस असे ओरडू लागला. पर्स का फेकून दे असे तो सांगतोय हे तिला समजेना, पण एकदम तिची ट्यूब पेटली. वाईतील काशी विश्वेश्वराचे मंदिरातील अंगार्याची पुडी तिच्या पर्समध्ये होती.आता आपण अमानवी शक्तीच्या सोबत आहोत हे तिला समजून चुकले.....

   तिने त्याच्याकडे न पहाता व त्याच्या रागावण्याकडे लक्ष न देता कालभैरवाष्टक पठण सुरू ठेवले. अन पर्स उघडून ती अंगार्याची पुडी शोधू लागली. अंगार्याची पुडी तिला सापडली हे समजताच रोहनच्या डोळ्यात अंगार फुलला. तिने अंगार्याची चिमूट स्वत: च्या कपाळावर लावली, अन दुसरी चिमूट भरली व रोहनच्या दिशेने फेकली. अंगारा अंगावर पडताच रोहनने अंगाची विचित्र हालचाल केली अन रोहन जोरात झटका बसल्यासारखा उडून जोरात सीटवर आपटला व बेशुद्ध झाला.अन त्याचक्षणी गाडीची पुढची काच मोठा आवाज होऊन तडकली. हे सगळे अगदी क्षणार्धात घडले, त्याचे आकलन व्हायला विनीला काही वेळ लागला. तिने रोहनच्या कपाळावर अंगारा लावला व तोंडावर पाणी शिंपडले, पण तो शुद्धीवर आला नाही.

    तिचे पठण सुरुच होते. गाडीच्या सभोवती कसला तरी दाब वाढतोय असे तिला जाणवले. दार तर उघडणे शक्यच नव्हते. तिच्या मनात विचार आला, समोरची काच तडकली आहे, तिथून बाहेरील शक्तीचा अंदाज घेता येतोय का पाहूया! 

मग तीने वर्तमानपत्राची गोल गुंडाळी केली व ती तडकलेल्या काचेच्या जवळ नेली व दुसऱ्या बाजूने कान लावून काही जाणवतेय का ते ऐकायचा प्रयत्न केला. त्या एका मिनिटांत तिला बाहेरील अनोख्या विश्वातील जो कोलाहल ऐकू आला, त्याने तिच्या मनाचा थरकापच उडाला. अन वर्तमानपत्राची गुंडाळी फक्त तडकलेल्या काचेजवळ होती, तरीही बाहेरील शक्तीची जाणीव तिला झाली. तिने त्या गुंडाळीच्या तोंडाशी आता डोळा लावला व काही दिसतेय का ते ती पाहू लागली. त्या तडकलेल्या काचेच्या बारीकशा छेदातूनही पलिकडे अमानवी शक्तीची चाललेली घालमेल तिला जाणवली. बाहेर पडावे लागल्याने व हातातील सावज सोडावे लागल्याने खदखदत असलेला संताप जाणवला. चेहरा, रंग, रुप नसतानाही त्या शक्तीचे अस्तित्व विनीला जाणवले, अन डोक्यात धोक्याची घंटा वाजली.. 

         तिने रोहनला हाका मारुन जागे करण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. मग तिने रोहनला ड्रायव्हर सीटवरुन कसेतरी ओढून तिच्या सीटवर झोपवले व तीने स्टेअरिंगचा ताबा घेतला.हे करत असताना बाहेरील शक्तीचा चाललेला थयथयाट स्पष्टपणे जाणवत होता.

    तोंडाने अखंडपणे कालभैरवाष्टक पठण सुरुच होते. स्टेअरिंगचा ताबा घेतल्यावर तिने सर्वप्रथम तडकलेल्या काचेच्या जागी अंगार्याची चिमूट भरली, अन गाडी सुरू केली. गाडी सुरू झाली, तिने ती पुढे काढायचा प्रयत्न केला,पण गाडी जागेवरुन तसूभरही हलली नाही.जणू गाडीच्या टायर्सना जॅमर लावले होते.तिने मग सर्वशक्तीनिशी पटकन गाडी रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला. बहुतेक ती अमानवी शक्ती असे काही होईल याविषयी अनभिज्ञ होती. तोच एक क्षण विनीच्या फायद्याचा ठरला व विनीने सुसाट वेगाने गाडी विरुद्ध दिशेला वाईच्या दिशेने पळवली. थोडावेळ गाडी मागे ओढण्याचा प्रयत्न होतोय असे तिला जाणवले, पण त्या शक्तीच्या टप्प्यातून गाडी बाहेर पडली की तिला आपली शक्ती बहुधा वापरता येत नसावी. त्यामुळे पुढे अगदी व्यवस्थितपणे गाडी सुराला लागली. वाईत मंदिराशेजारी असणाऱ्या धर्मशाळेजवळ पोहोचल्यावरच विनीने गाडी थांबवली. घड्याळात पाहिले तर पहाटेचे तीन वाजले होते.... गाडी थांबताच रोहन जागा झाला व गाडी बाहेर पहात आपण इकडे कुठे आलो? तू कधी स्टेअरिंगचा ताबा घेतलास? अन मला कसे समजले नाही? अशी प्रश्नांची सरबत्ती त्याने सुरू केली. 


यावर मंदपणे हसत विनीने सांगितले, चल.. जागा आहे का झोपायला विचारुया.. आजची रात्र वाईतच काढावी अशी काशी विश्वेश्वराचीच इच्छा आहे. त्यावर आपण काय करणार? 


तिचे हे बोलणे ऐकून अजूनच अचंबित झालेल्या रोहनचा हात हातात घेऊन विनी धर्मशाळेच्या पायर्या चढू लागली आज आलेल्या अमानवी संकटाला परतावून लावण्यात आपण यशस्वी झालो आहोत या समाधानात..

 मंदिरात पहाटेच्या भूपाळ्या सुरु झाल्या.. अन ती समाधानाने रुममध्ये रोहनच्या कुशीत शिरली. इति हेमा उवाच 

©️ सौ. हेमा पाटील.

Comments

Popular posts from this blog

वर्षाव शुभेच्छांचा

समज

रिती ओंजळ