गझल रसग्रहण

 

#गझलरसग्रहण

सौ.हेमा पाटील 


दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले

थबकले न पाय तरी, हृदय मात्र थांबले


वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली

अन् माझि पायपीट डोळ्यांतून सांडली


मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल

अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल


मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नांत चूर

तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल


विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व

पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल


सहज कधी तू घरात लावशील सांजवात

माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल


जेव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील

माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल


जेव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत

माझे तारुण्य तुझ्या गात्रातून गुणगुणेल


मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद

माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल

                                   सुरेश भट


कविवर्य सुरेश भट यांची ही गझल  प्रेमीयुगुलांची ताटातूट झाल्यानंतरची विरहाची अवस्था दर्शवतेय.


प्रेमाबाबत काय बोलावे....आपल्या प्रिय सखी चे  दुसऱ्या कुणाशी लग्न झाले आहे ही गोष्ट स्विकारणे फार क्लेशकारक आहे.

लगी लगी है ये दिल की लगी

न समझो इसे दिल्लगी...

प्रेमात खूप ताकद असते असे म्हणतात.आयुष्यात जर प्रेमात यशस्वी झाले तर  बातच काही और..पण दुर्दैवाने जर प्रेमात विरह वाट्याला आला तर ती वाट व्यक्तीला कणाकणाने झिजवत मृत्यूच्या छायेत घेऊन जाते. गझल समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे...काही चुकले असल्यास माफी असावी..🙏🙏


विमनस्क अवस्थेत फिरताना वाटेत तिचे गाव लागले तेव्हा पायांना थांबण्याची अनुमती नव्हती,पण वेडे हृदय मात्र तिथेच थबकले, कारण त्या हृदयात असलेली तिची छबी दुरुन तरी का होईना दिसावी अशी इच्छा होती.


प्रेयसी जरी दुरावली असली तरी तिच्या मनाविरुद्ध तिला निर्णय घ्यावा लागला असणार ... त्यामुळे आजही तिची अबोल,आणि उदास हाक त्याच्या मनाला स्पर्शून गेली. त्या जाणीवेने आपली झालेली ताटातूट अधिकच तीव्रतेने डोळ्यांवाटे वाहू लागली.तिच्यावाचून आयुष्यात काहीच उरले नाही.ती जाताना आपल्यासोबत माझे आयुष्य ही घेऊन गेली होती,ते शोधण्यासाठी चाललेली माझी पायपीट तुझ्या वेशीपाशी येऊन थांबलीय...


आता माझा जीव तू दिसशील म्हणून कासावीस होऊन तुझ्या एका दृष्टिक्षेपाची वाट पहात बसलाय ज्याला ऊन्हातान्हाची पर्वा नाही ना भुकेची..

पण मी आर्ततेने तुझी काढत असलेली आठवण... तुझ्यापर्यंत ती साद नक्की पोहोचेल अन् तुझ्या काळजात हुरहूर दाटून येईल.तू ही माझ्या आठवणीने घायाळ होशील आणि हृदयातील गतस्मृतींना उजाळा देशील.


तुझ्याजवळ येण्याचा नैतिक अधिकार मी गमावला असला तरी  माझ्यासाठी मात्र तूच माझे सर्वस्व आहेस. त्यामुळे मी क्षणोक्षणी तुझ्या जवळ असण्याच्या स्वप्नातच चूर असतो. स्वप्न हेच माझे आयुष्य बनले आहे, किंबहुना त्या स्वप्नांमुळेच मी तुझ्यापासून दुरावूनही अजूनही जिवंत आहे.

तुझ्यावर नैतिकतेची बंधने लादली गेली आहेत, त्यामुळे तू  माझ्या आठवणीने अगदी व्याकुळ झालीस तरीही घराच्या उंबरठ्याची लक्ष्मणरेषा तू ओलांडणार नाहीस...मला खात्री आहे..


आता तू माझी राहिली नाहीस, त्यामुळे आपल्या त्या भेटीगाठी,ते बोलणे, ती मिठी,ती भेटीतील आतुरता ..हे सगळे तू विसरशील...पण माझे नाव मात्र तुझ्या ओठांवर कायमच विलसत राहील...


घरात सांजवात लावताना तू घरातील सर्वांसाठी शुभकामना करशील, सर्वांसाठी दिर्घायुष्य मागशील.त्या हात जोडून उभ्या असलेल्या तुझ्या सात्विक रुपाकडे पाहून माझेही मन ज्योतीसह थरथरेल. तुझ्या प्रार्थनेत माझे नाव नसेलही,पण तुझे हृदय न बोलता माझ्यासाठी ही प्रार्थना करत असणार याची खात्री असल्याने माझे मन  तुझ्या प्रेमासाठी थरथरेल...


जेव्हा स्त्री सचैल स्नान करते तेव्हा ती कुठल्याही मेकअप शिवाय सुंदर दिसते.तिचा मोकळा सोडलेला केशसंभार..त्याच्या कपाळाभोवती वेटोळे घातलेल्या बारीक बटा बोटांनी मागे सारत तू जेव्हा आरशासमोर स्वतःला न्याहाळत उभी राहशील तेव्हा तुला तुझ्याभोवती माझ्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल कारण तुझ्या केशसंभारात आजही माझा जीव अडकलाय..मी अनेक योजने दूर असूनही तुझ्यातच अडकून पडलोय.. त्यामुळे त्या माझ्या तुझ्यातच असण्याची जाणीव तुला नक्की होईल...


जेव्हा तू रात्री एकांतात माझ्या आठवणीने व्याकुळ होऊन माझे गीत आठवशील  तेव्हा माझे तारुण्य तुझ्या देहाच्या कणाकणात आपले अस्तित्व दाखवेल..


मग सुटलेला मंद वारा वसंत ऋतुच्या आगमनाची आठवण करुन देईल.वसंत ऋतू म्हणजे प्रेमी जनांच्या मीलनाचा काळ! आणि त्यावेळेस  विरहाचे चटके सहन न होऊन प्राजक्ताच्या सड्याप्रमाणे माझे सगळे आयुष्य   तुझ्या अंगणात टपटप पडताना हे आयुष्य सार्थकी लागेल.एक विरहात तडफडणारा जीव कायमचा शांत होईल...

       ‌.              सौ.हेमा पाटील.

दिनांक १५/४/२०२४

Comments

Popular posts from this blog

वर्षाव शुभेच्छांचा

समज

रिती ओंजळ